Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा

| Updated on: Aug 03, 2023 | 12:22 PM

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. पुणे शहरापेक्षा या ठिकाणी पाऊस चांगला झाला. या पावसामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे का?

Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा
khadakwasla
Follow us on

पुणे | 3 ऑगस्ट 2023 : राज्यात उशिराने आलेला मान्सून जुलै महिन्यात चांगलाच बरसला. या पावसामुळे कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी हाहा:कर उडाला होता. विदर्भात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. अनेक गावांना पुराने वेढले होते. पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला नसला तरी पुणे परिसरातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर यांची पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. यामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे.

खडकवासलाची काय आहे परिस्थिती

खडकवासला धरणात ९८ टक्के जलसाठा झाला आहे. पाणशेत धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. वरसगाव धरणात ७७ तर टेमघर धरणात ६० टक्के जलासाठा आहे. यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याची चिंता आता राहणार नाही. पुणे शहरात पाणी कपातही आता होणार नाही.

निरा देधवर ९० टक्के भरले

पुण्याच्या भोर तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे निरा देवघर धरणं 90 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या विदुयतगृहद्वारे 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाकडून करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

पवना धरणात ९२ टक्के जलसाठा

पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा 92.72 टक्के झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. वीज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये 1400 क्यूसेस विसर्ग केला जात आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून आवाहन

धरणातून पाणी सोडले जाणार असल्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे तत्काळ हलविण्यात यावेत, अशा सूचना पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.