पुणे महानगरपालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना ‘जोर का झटका’, काय आहे कारण?

| Updated on: Jun 20, 2023 | 8:29 AM

Pune News : पुणे महानगरपालिकेत भरतीचा नवीन टप्पा सुरु होत असताना नुकताच रुजू झालेल्या तीन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आहे. या अधिकाऱ्यांना सेवेतून सरळ बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना जोर का झटका, काय आहे कारण?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

योगेश बोरसे, पुणे : पुणे महानगरपालिकेने आपल्या तीन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. कारवाई झालेले अधिकारी कनिष्ठ अभियंता आहे. या तिघांना सरळ बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी अन् अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली.

काय आहे कारण

राज्यभरातील महापालिकांमधील कर्मचारी भरतीवर बंदी होती. राज्य सरकारने ही बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेने भरती सुरू झाली. महानगरापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून भरती सुरु करण्यात आली होती. यामध्ये निवड झालेल्या काही जणांची प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामुळे यासंदर्भात तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीकडून कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला.

काय आहे अहवालात

चौकशी समितीच्या अहवालानुसार तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या तीन कनिष्ठ अभियंत्यांना महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले. या तिघांवर पालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप आहे. या कारवाईमुळे महानगरपालिकेत खळबळ माजली आहे.

आता पुन्हा भरती प्रक्रिया

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १५० जागा रिक्त आहे. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिला. या जागांसाठी साधारण जुलैअखेर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महानगरपालिकेत काही गावांचा समावेश झाला आहे. ही गावे अन् कार्यकारी अभियंता या पदावर भरतीसाठी आकृतीबंधात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर लगेचच भरतीप्रक्रिया सुरु होईल. या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची १५० आणि कार्यकारी अभियंता पदाच्या नऊ ते १० जागा असतील.