लाडकी बहीण योजनेची मी पहिली लाभार्थी : भावना गवळी
"मी पाच वेळा खासदार म्हणून निवडून आली तरी उमेदवारी दिली नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला विधान परिषदेवर आमदार बनविले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची मी पहिली लाभार्थी आहे", असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरातील लाखो महिला अर्ज करत आहेत. येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चाच आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार भावना गवळी यांनी आपण लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी असल्याचं म्हटलं आहे. भावना गवळी यांना लोकसभेच्या निवडणुकीवेळी तिकीट कापण्यात आलं होतं. विशेष म्हणजे भावना गवळी या 5 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तरीही त्यांचं तिकीट कापण्यात आल्याने भावना गवळी या नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर भावना गवळी यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. त्यामुळे भावना गवळी यांची नारीज दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. विशेष म्हणजे भावना गवळी यांनी लाडकी बहीण योजनेवर मजेशीर वक्तव्य केलं आहे.
भावना गवळी नेमकं काय म्हणाल्या?
“मी पाच वेळा खासदार म्हणून निवडून आली तरी उमेदवारी दिली नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला विधान परिषदेवर आमदार बनविले. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची मी पहिली लाभार्थी आहे”, असं भावना गवळी म्हणाल्या. “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना एकत्र बसवून निर्णय घ्यायचा आहे. माझ्या मनात कोणताही भेदभाव नाही. मी रुसवे फुगवे ठेवत नाही. माझा कोणाशी भेदभाव नाही. मी 25 वर्ष महिला खासदार म्हणून काम करत आहे. मी ठरवलं तर इकडे तिकडे करत अनेकांच्या भानगडी लावल्या असत्या. दिल्लीत मोठ्या पदावर असते. मात्र मी सर्वांना कामाशी जोडत गेले”, असं भावना गवळी म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य भावना गवळी बोलत होत्या. भावना गवळी यांची विधान परिषदेवर आमदार पदी नियुक्ती झाल्याने कारंजा शहरात त्यांचं राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष युसुफ पुंजानी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी आमदार भावना गवळी यांना कारंजा शहरात येण्यासाठी उशिर झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करत ‘सेठ मै देर करती नहीं देर हो जाती है’ म्हणत 140 च्या स्पीडने मी याठिकाणी पोहचली असल्याचं भावना गवळी यांनी सांगितलं.
कारंजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्थानिक पुंजानी कॉम्प्लेक्स येथे पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ किलो लाडू आणि 10 हजार शेतकऱ्यांना छत्री, रेनकोट, बॅग वाटप आणि भावना गवळी यांची विधान परिषद आमदार निवडून आल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता.