“सर्वोच्च न्यायालयाने पूजा चव्हाण प्रकरणाची दखल का घेतली नाही?” संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “संजय राठोड फडणवीसांच्या…”
इतर राज्यांत महिलांवर हेच अत्याचार सुरू असताना हे हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःहून न्यायासाठी पुढे येणे का होत नाही? असा रोखठोक सवालही संजय राऊतांनी विचारला.

Pooja Chavan Suicide Case : कोलाकातामधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. कोलकातामधील आरजी कर मेडीकल कॉलेज, रुग्णालयात ही घटना घडली. या प्रकरणानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी बंदची हाक दिली आहे. आता या प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलीच टीका केली आहे. महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येने फक्त कोलकाताच नव्हे, तर देश हादरला, पण या घटनेचे राजकीय भांडवल ‘भाजप’ करीत आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात कोलकातामधील त्या घटनेवर भाष्य करण्यात आले. संजय राऊत यांनी याप्रकरणी भाजपकडून या घटनेचे राजकीय भांडवल केले जात आहे, असा आरोप केला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे. प. बंगालात ही व्यवस्था बिघडल्याचे चित्र नाही, पण ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
“या अत्याचाराची दखल कोणीच घेतली नाही”
“कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत. पीडित महिला डॉक्टर नसतील, पण त्या अबलाच आहेत व त्यांच्यावरही त्याच पद्धतीने लांडग्यांनी झडप घातली. मुझफ्फरपूरच्या पारू गावातून 11 ऑगस्ट रोजी एका मुलीस गुंडांनी घरात घुसून उचलून नेले. दोन दिवसांनी तिचा मृतदेह गावाबाहेरच्या तलावात सापडला. त्या अभागी तरुणीच्या शरीरावर अत्याचाराच्या असंख्य खुणा होत्या. तिच्या कुटुंबीयांचा आक्रोश ना सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला ना दिल्लीतील गृह मंत्रालयापर्यंत. या अत्याचाराची दखल कोणीच घेतली नाही, असे का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
“कारण या राज्यांत भाजपची सरकारे आहेत”
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो प. बंगालात निर्माण झाल्याची बोंब ठोकली जात आहे, तीच बोंब बिहारच्या बाबतीत या लोकांनी का मारू नये? उत्तर प्रदेशात अशा दुर्दैवी घटना रोजच घडत आहेत. हाथरससारख्या घटनांनी तर देशाची मान शरमेने खाली गेली. रात्रीच्या अंधारात त्या पीडितेवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले गेले. तेव्हाही सर्वोच्च न्यायालय जागे झाले नव्हते. कारण या राज्यांत भाजपची सरकारे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
“या ढोंगबाजीस काय म्हणावे?”
महाराष्ट्रातील एक मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण अतिगंभीर आहे. पीडित पूजा चव्हाणने तर आत्महत्याच केली व त्याबद्दल भाजपच्या महिला मंडळाने त्या वेळी आंदोलने केली होती. आज हे महाशय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात व भाजपचे महिला मंडळ या मंत्र्यांची ओवाळणी करत आहे. याप्रकरणीही ना सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली ना तुमच्या त्या सीबीआयने, पण कोलकात्याच्या घटनेने या सगळ्याच संस्था छाती पिटत आहेत. या ढोंगबाजीस काय म्हणावे? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
एका बाजूला लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे व त्या बदल्यात मते दिली नाहीत तर धमक्या द्यायच्या. ही धमकीची भाषा म्हणजे महिलांवरील अत्याचारच आहे. देशातील महिलांना सध्या अशा अनेक दिव्यांतून जावे लागत आहे. महिलांवरील बलात्कार, हत्या, अत्याचार हा राजकीय साठमारीचा विषय होत आहे व नारी शक्तीची ती अवहेलना आहे. प. बंगालातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार व हत्येने देश हळहळला, दिल्ली हादरली. मग इतर राज्यांत महिलांवर हेच अत्याचार सुरू असताना हे हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःहून न्यायासाठी पुढे येणे का होत नाही? असा रोखठोक सवालही संजय राऊतांनी विचारला.