हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमक, थेट रास्ता रोको, काय घडतंय?
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्यांचे समर्थकदेखील ठाण्यात आक्रमक झाले. त्यांनी ठाणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते बाजूला होण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर शरद पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची माहिती वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शेकडो कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जमले. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची अवस्था पाहिली. तसेच आव्हाड सुखरुप आहेत ना, याची शहानिशा केली. यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी रस्ता रोको केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर अर्धा तास सलग आंदोलनानंतर ठाण्याच्या वर्तक नगर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या दरम्यान पोलिसांनी महामार्गाची वाहतूक सुरु केली होती.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर आज स्वाराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर संभीराजे यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे समर्थकही आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आव्हाडांच्या घरी जमले. यानंतर त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर रस्ता रोको आंदोलन केलं.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना रस्त्यावरुन बाजूला होण्याची विनंती केली. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांना आपलं बळ वापरुन कार्यकर्त्यांना बाजूला करावं लागलं. यानंतर पुन्हा वाहतूक सुरु झाली. पोलिसांनी याप्रकरणी अनेक आंदोलनाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.