Kalyan | कल्याणमध्ये एकाच घरातील तीन मुलं अचानक गायब, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील तीन लहान मुलं शाळेत गेली. पण संध्याकाळी ती मुलं शाळा सुटल्यानंतर घरी परतलीच नाहीत. ही मुलं शाळेच्या शिक्षकांनादेखील भेटली. पण ती घरी परतलीच नाहीत. पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
![Kalyan | कल्याणमध्ये एकाच घरातील तीन मुलं अचानक गायब, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड Kalyan | कल्याणमध्ये एकाच घरातील तीन मुलं अचानक गायब, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/kalyan-mahatma-phule-police.jpg?w=1280)
सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 19 ऑक्टोबर 2023 : कल्याण पश्चिम परिसरात शाळेत शिकण्यासाठी गेलेली तीन मुलं अचानाक बेपत्ता झाली. संबंधित घटना काल (18 ऑक्टोबर) दुपारी घडली. मुलांच्या वडिलांनी या संदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी 24 तासाच्या आत गायब झालेली एक मुलगी आणि दोन मुलांना खडवली नदी परिसरातून शोधून काढले. पोलीस वेळीच पोहचल्याने मुले वाचली. पोलिसांच्या तपासात ही मुले कल्याण वरून ट्रेनचा प्रवास करुन कुठे पोहोचली, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय.
कल्याण रामबाग परिसरात विजय तोंबर हे वास्तव्यास आहेत. त्यांना चार मुले आहेत. यापैकी त्यांची तीन मुलं कल्याण पश्चिम येथील जोशीबाग स्कूलमध्ये शिकतात. ही मुलं बुधवारी दुपारी शाळेत गेली. शाळेच्या गेटवर या तिघांना त्यांचे शिक्षक भेटले. पण ही मुलं अचानाक बेपत्ता झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही मुलं घरी न परतल्याने विजय तुंबर यांनी याविषयी कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मुलांचा शोध कसा लावला?
विजय तुंबर यांची तक्रार मिळताच कल्याण झोन तीनचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयात करण्यात आलं. या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. याच दरम्यान त्यांना कल्याण रेल्वे स्टेशनवरून ही तीन मुलं आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये जाताना दिसली. त्यानंतर या पथकाने सर्वच स्टेशनचे सीसीटीव्ही तपासणी केली.
या दरम्यान ही तीनही मुलं खडवली रेल्वे स्थानकावर उतरताना दिसले. या मुलांच्या शोधासाठी पोलीस पथक खडवली रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी पोलिसांनी मुलं रेल्वे स्थानकावर भेटले. पोलिसांनी या तिघांना विचारले असता हे तीनही मुलं शाळेच्या नावाने खडवली नदीत आंघोळीसाठी आले, अशी कबुली त्यांनी दिली. घरी परतत असताना रात्री रस्ता चुकल्याने ही तीनही मुलं शहरात भटकत होती. पोलिसांनी या मुलांचा वेळेवर शोध घेतल्याने सुदैवाने त्यांना कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पोलिसांनी तीनही मुलांना कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आहे.