Maharashtra Breaking News LIVE : मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यांचा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आढावा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु आहे. कोकण, विदर्भ, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सांगलीमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच आज भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकलं जाणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद
सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील वारणा पूल हा सांगली-कोल्हापूरला जोडणारा पूल असून या पुलावर आता पाणी आल्याने वाहतुकीसाठी नागरिकांना बद करण्यात आला आहे. या ठिकाणी कुरळप पोलिसांचा चोख असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पुलावर पाणी आल्याने आता नागरिकांना आणि शालेय मुलांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.
-
चंद्रपुरात बचाव पथकाने 100 वर्षीय वृद्धेचे प्राण वाचवले
चंद्रपुरात बचाव पथकाने 100 वर्षीय वृद्धेची सुटका केली. चंद्रपूर-मूल मार्गावरच्या प्रसिद्ध झोपला मारुती देवस्थान परिसरात वृद्ध महिला वास्तव्याला होती. जिमाबाई दशरथ कुमरे झोपडीवजा घरात अडकल्याची माहिती मिळताच बचाव पथक रवाना झाले. जंगलातील झाडेझुडपे आणि महापूर याची पर्वा न करता बचाव पथकाची टीम झोपडीपाशी पोहोचली. वृद्धेला सुखरूप काढत अजयपूर गावात तिची व्यवस्था केली.
-
-
गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती, 242 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे कोटगल बॅरेज येथील 70 मजुरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहून गेल्या तीन दिवसात 242 नागरिक आणि 80 विद्यार्थी, भामरागड येथील 50 नागरिकांना सुरक्षित जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये हलविण्यात आले आहे.
-
खड्डा चुकवायला गेले आणि महामंडळाची एसटी बस गेली नालीत
नांदेडमध्ये महामंडळाच्या एसटी बसला अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा नादात एसटी बस लगतच्या नाल्यात गेली. नालीमध्ये फसलेले चाक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
अमित शहा यांची कीव येते, शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
मागची दहा बारा वर्षे सातत्याने महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांवर टीका करणे एवढाच उद्योग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना राहिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जे भ्रष्टाचाराचे सरदार आपल्या पक्षात घेतले आहेत त्याचे आत्मचिंतन अमित शहा यांनी करावे अशी टीका शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
-
-
पावसामुळे मुंबई – गोवा महामार्ग ठप्प
सततधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिजवरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी हा ब्रिटिश कालीन ब्रिज आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षितता म्हणून ही वाहतूक थांबवली आहे.
-
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई ठाण्यात मुसळधार, मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
मुंबई ठाणे आणि तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय. तसेच काही ठिकाणी घरातही पावसाचं पाणी शिरलंय. अशात ज्या ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे, त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री फोनवरून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आढावा घेत आहेत.
-
विधानसभेच्या निवडणुकीबाबत अमित शाह काय म्हणाले?
आगामी निवडणुकीबाबत अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. भाजपच्या नेतृत्वात महायुती विधानसभेची निवडणूक जिंकेल, असं अमित शाह म्हणाले.
-
भाजपच्या अधिवेशनात अमित शाह यांचं भाषण
पुण्यात भाजपचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संबोधित करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. लोकमान्य टिळक यांचाही उल्लेख अमित शाह यांनी केला आहे.
-
चंद्रपूर गावात पाणी शिरलं, 25 ते 30 घरांमध्ये पाणीच पाणी
चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी तालुक्यातील माल डोंगरी येथील तलाव फुटल्याने धानोली पोहा गावात पाणी शिरलं आहे. जिल्ह्यात गेले 2 दिवस संततधार पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ झाली होती. तलाव फुटल्याने धानोली पोहा गावातील किमान 25 ते 30 घरांमध्ये शिरले. पाणी तर शेकडो हेक्ट्टर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. मालडोंगरी हे गाव उंचावर असल्याने तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या धानोली पोहा गावात झपाट्याने पाणी शिरले आहे.
-
घाटकोपरमध्ये दरड कोसळली
घाटकोपरमधील कातोडीपाडामध्ये दरड कोसळली आहे. घरांवर मातीचा ढिगार सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
-
इरई धरणाची सर्व 7 दरवाजे उघडले
चंद्रपूर जिल्ह्यात शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दरवाजे आता 0.05 मीटरने उघडली आहेत. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या पाणीपातळीत यामुळे मोठी वाढ झाली आहे. हेच पाणी पुढे वर्धा नदीत वेगाने मिसळत असल्याने सध्या शहराच्या काही थोड्या सखल भागातच धरणाच्या पाण्याचा फटका बसलाय. मनपाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
-
जगबुडीला पूर खेड-दापोली मार्गावर वाहतूक बंद
सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय
-
कृष्णा आणि वारणा नदीच्या पातळीत वाढ
जिल्ह्यातील चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरातील पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदी पात्रात दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.त्याचबरोबर दोन्ही नद्यांच्या परिसरामध्ये गेल्या आठ दिवसात पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
-
अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानंतर आज काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी पाण्यात बसून आंदोलन
काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीएमसीवर आरोप करत बीएमसी चोर असल्याचे सांगितले. मुंबईकरांकडून हजारो कोटी रुपये घेऊन बीएमसीने येथे जलतरण तलाव बांधला आहे.
-
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं- फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. परंतू ठाकरे सरकारला ते आरक्षण टिकवता आले नाही.
-
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका- फडणवीस
भाजपाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे.
-
आपल्याला संवाद आणि संपर्क करायचा आहे- फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याला संवाद आणि संपर्क करायचा आहे. भाजपाच्या अधिवेशनात बोलताना फडणवीस दिसले.
-
मुंबई उपनगरातील मुसळधार पाऊस
मुंबई उपनगरातील बोरिवली गोरेगाव मालाड दहिसर अंधेरी परिसरात दुपारपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे.अंधेरी भुयारी मार्ग गेल्या 2 तासांपासून बंद असल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.
-
मी मराठा आहे अंगावर आलं की शिंगावर घेणार- प्रसाद लाड
मनोज जरांगे यांना कोणीतरी मिस गाइड करत आहे. आपण चर्चा करू या तुम्ही. मी मराठा आहे अंगावर आलं की शिंगावर घेणार शिंगावर आलं की अंगावर घेणार, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
-
उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी- बावनकुळे
“उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं. सामाजिक आंदोलनातून देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय,” अशी टिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
-
निवडणुका जिंकणं हे आमचं अंतिम ध्येय- अशोक चव्हाण
भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले, “निवडणुकीची रणनिती तयार आहे आणि निवडणुकीचा कार्यक्रम भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाईल. निवडणुका जिंकणं हे आमचं अंतिम ध्येय आहे.”
-
देवेंद्र फडणवीस यांना जर टार्गेट करत असाल तर सहन केलं जाणार नाही- सदाभाऊ खोत
“मनोज जरांगे पाटील यांना आमचा पाठींबा आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांना जर टार्गेट करत असाल तर सहन केलं जाणार नाही. राजू शेट्टींची परिवर्तन आघाडी म्हणजे पराभूत मानसिकता असणारे लोक आहेत, ते निवडणूक लढवू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.
-
सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महाराष्ट्रात पडत असलेल्या अतीमुसळधार पाऊसामुळे कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्धभवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली.
-
चंद्रपूर- अंधारी नदीच्या पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 लोकांना रेस्क्यू करण्यात यश
चंद्रपूर- अंधारी नदीच्या पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 लोकांना रेस्क्यू करण्यात यश मिळालं आहे. पोलिसांच्या रेस्क्यू टीमने पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढलं. अजयपूर, हळदी, पिंपळखुट या भागातील गावात आणि शेतात लोक अडकले होते. पिंपळखुट इथल्या रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधारी नदीच्या पुरामुळे चंद्रपूर-मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
हा मार्ग वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कुरुंदवाडला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील शिरडून गावाजवळील पुलावर पुराचे पाणी वाहत आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे.
-
विजेचा शॉक लागून बिबट्या-मोराचा मृत्यू
विजेचा शॉक लागून मोर आणि बिबट्याचा मृत्यू ओढावला. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील पानसरे वस्तीवर ही घटना समोर आली आहे. मृत मोर आणि बिबट्याला चांदवड वनविभागाने ताब्यात घेतले.
-
पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद
मुंबई उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडत आहे. अंधेरी भुयारी मार्ग पावसाचे पाणी तुंबल्याने बंद करण्यात आला आहे. भुयारी मार्ग दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
-
प्रवीण दरेकर यांच्यावर जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी शांतता मोर्चा काढल्यानंतर आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यातच आता भाजप नेते प्रवीण दरेकर हे जरांगे यांच्या निशाण्यावर आले आहेत.
-
सर्वपक्षीय बैठकीकडे ठाकरे गटाची पाठ
संसदेच्या सर्वपक्षीय बैठकीकडे शिवसेना ठाकरे गटाने पाठ दाखवली आहे. सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत.
-
सर्वसामन्यांचे किचन बजेट कोलमडले
भीषण उन्हाळा आणि आता मुसळधार पाऊस यामुळे भाजीपाला महागला आहे. टोमॅटोसह अनेक भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दोन दिवसांवर अर्थसंकल्प येऊन ठेपला असताना सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत.
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची एकीची साद
अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं विधान केल्यानंतर अजित पवार गटाच्या इतर दोन आमदारांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आल्यास आनंद होईल, परंतु यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे.
-
गडचिरोलीचा विदर्भाशी संपर्क तुटला, 30 मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसाच्या मुसळधार पावसाचा फटक्यामुळे ५ राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील 30 मार्ग बंद झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या संपर्क नागपूर विदर्भाची महाराष्ट्राची पूर्णपणे तुटलेला आहे.
-
शरद पवार गटाचा जळगावात मेळावा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याचे दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज जळगावतील श्रीकृष्ण लॉन येथे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता भव्य मेळावा होत आहे.
-
ठाणे जिल्ह्यात ८,०१९ शस्त्रक्रिया
केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षांपर्यंत सर्व बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. त्यानुसार ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१३ ते २०२४ पर्यंत तब्बल ८,०१९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
-
मुंब्रात आठ दिवसांत ४२ शिक्षकांची नियुक्ती
मुंब्रा आणि दिवा प्रभाग क्षेत्रांतील शाळेतील विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेता शिक्षक वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली. यानुसार आठ दिवसांत ४२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.
-
मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेली मनोज जरांगे पाटील यांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक उपोषण स्थळी दाखल झाले आहे
-
Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाची संततधार सुरुच, इरई धरणाचे दरवाजे उघडले
Maharashtra News : चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाची संततधार सुरुच
इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने करण्यात आले खुले,
462 क्यूबिक मीटर प्रति सेकंद या वेगाने धरणाचे पाणी इरई नदीत सोडले जात आहे
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने इरई नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हीच नदी चंद्रपूर शहराला वळसा घालून जात असल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिका कोणत्याही आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज
-
Maharashtra News : कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची विश्रांती
Maharashtra News : कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची विश्रांती
गेले दोन दिवसापासून पावसाची सुरू होती संततधार
अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने काही सखल भागत पाणी साचल्याची घटना
पाऊसाचा जोर कमी होताच पाण्याचा निचरा
कल्याण डोंबिवली परिसर ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे
-
Maharashtra News : नागपुरात 7 तासात 227 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत
Maharashtra News : नागपुरात काल मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झालं
सात तासात 227 मिमी पावसाची नोंद झाली
दुपारी 12 नंतर पावसाने उसंत घेतली
रात्री काहीसा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला मात्र सकाळी पावसाने उसंत दिली
सकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण हवामान विभागाने अलर्ट घोषित केल त्यामुळे पावसाचा जोर वाढणार का याकडे लक्ष
-
Maharashtra News : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, वाहतूक 10 मिनिटे उशिराने
Maharashtra News : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या 10 मिनिट उशिराने सुरु
लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कर्जत आणि कसाऱ्यावरून कल्याणला येणाऱ्या गाड्याना तांत्रिक अडचण
त्यामुळे लोकल ट्रेन उशिरा धावत असल्याची माहिती
-
Maharashtra News : सांगलीतील वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
Maharashtra News : सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्याचबरोबर सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडले आहे. तर नदीकाठच्या शेतामध्ये वारणेचे पाणी शिरल्याने ऊस आणि अन्य पिकं पाण्यामध्ये गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे
Published On - Jul 21,2024 9:35 AM