“मोदींची ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना, दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार…”, अर्थसंकल्पावरुन उद्धव ठाकरे यांचा घणाघात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर महाराष्ट्रात विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर "या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली", अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवरही निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.
ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील अर्थसंकल्पावर टीका केली आहे. “आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेल्याचं दिसलं नाही! महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधान विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर ह्यांचा जूना आकस आहे म्हणून?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.
आदित्य ठाकरेंचा घणाघात
“बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी?महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी ह्या बजेटमधून काय मिळवता आलंय? ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा! मिंधे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करुन राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचं राजकारण करायला जमतं! महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचं भलं करण्याची धमकच ह्यांच्यात नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
रोहित पवारांचाही निशाणा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. “देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. पण दुर्दैवाने भाजप सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला. कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. शरद पवारांना परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते”, असा दावा रोहित पवारांनी केला.
“हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी होते का ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या बार्गेनिंग आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती. असो या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे”, असा घणाघात रोहित पवारांनी केला.