देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

विधिमंडळाचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात गेले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे देखील त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
“महाराष्ट्रात सुस्कृंत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते कसे जिंकले हे अनाकलनीय आहे. आम्ही जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडू. देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासंदर्भात होती ते कळेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भेट घ्यायला गेलो होतो”, असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी दिला. “ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय मॅच्युरीटी दाखवत आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करावं. राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रासाठी एकत्र काम करावं याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राच्या हिताचं काम असावं. गंमत आहे की, काही लोक आज दिसत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “छगन भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. त्यांना एवढा अनुभव असताना त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.