उद्धव ठाकरे यांची संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वात मोठी खेळी, पडद्यामागे काय घडतंय?
उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीवरुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची किती तयारी सुरु आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण गेल्या साडेचार वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्याचं प्रतिबिंब आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यापैकी प्रत्येक घडामोडीवर महाराष्ट्राची जनता येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणार आहे. राज्यात नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनतेचा सर्वाधिक कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला. असं असलं तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सहा महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष नागरिकांच्या मनात घर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनादेखील जाहीर झाली आहे. असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन वर्षांपूर्वी जे घडलं त्याची त्यांना कदाचित कल्पना नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात खूप मोठी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. तसेच उद्धव ठाकरे यांच्याजवळ असलेलं मुख्यमंत्रीपद देखील गेलं. यानंतर शिवसेना फुटीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. सु्प्रीम कोर्टात या प्रकरणी अजूनही अंतिम सुनावणी संपलेली नाही. पण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं नाव देण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. आता याच चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगात महत्त्वाची मागणी केली आहे.
निवडणुकीत दोन उमेदवारांचे चिन्हं हे एकमेकांच्या साधर्म्याचे राहिले तर मतदारांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मतदाराला हव्या असणाऱ्या उमेदवाराला मतदान करता येत नाही. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह होतं. तर काही उमेदवारांचं तुतारी चिन्हं होतं. तर काहीचं पिपाणी चिन्हं होतं. त्यामुळे आपल्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची विनंती मान्य करत यापुढे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य साधणारं चिन्ह कोणत्याही उमेदवाराला देणार नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही तशीच विनंती निवडणूक आयोगात करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला पत्र
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांबचा विचार केला आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हाला साधर्म्य असणारं दुसऱ्या कुणाचं चिन्हं असेल तर आपल्याला फटका बसू शकतो, या विचारातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार आहे. आम्ही तयार केलेलं मशालीचं चिन्ह निवडणूक आयोगाला दिलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावरच लढणार, असं ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पत्रात ठाकरे गटाने महत्त्वाची मागणी केली आहे. आम्ही तयार केलेल्या मशालीच्या चिन्हाला मान्यता द्या. आम्हाला धनुष्यबाणाप्रमाणे मशालीचं चित्र मान्य करुन द्या. मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेत ठेऊ नये, अशीदेखील विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.