वारी म्हणजे काय…कधीपासून सुरु झाली वारी, दिंडी अन् वारीत फरक तरी काय?

ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन 'याची देही याची डोळा घेणे' म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे.

वारी म्हणजे काय...कधीपासून सुरु झाली वारी, दिंडी अन् वारीत फरक तरी काय?
Pandharpur vitthal rukmini mandir
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 9:33 AM

वैष्णवांचा मेळा… भक्तांचा सागर…समानतेचा संदेश…कपाळावर टिळा… गळ्यात तुळशीची माळ अन् मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे. ही वारी कधी चुकायची नाही…असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. काय आहे ही वारी. कधी अन् कशी सुरु झाली वारीची परंपरा. वारी आणि दिंडीमधील फरक काय, राज्यभरातून किती दिंड्या निघतात…जाणून घेऊ या सर्व माहिती या महाराष्ट्रातील अनोख्या परंपरेची.

वारी कधी सुरु झाली?

वारीचा इतिहास खूप दीर्घ आहे. त्यासाठी दीर्घ हा शब्द छोटा पडावा इतर मोठी परंपरा वारीला आहे. भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरु झाली. हे विश्वच माझे घर हा संदेश देण्यासाठी वारी सुरु झाली. वारी नेमकी कधी सुरु झाली? त्याचा नेमका उल्लेख नाही. परंतु संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगामध्येही वारीचा उल्लेख आहे, असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून आहे. ऐतिहासिक संदर्भांमध्ये 13 व्या शतकापासून वारीचे संदर्भ आणि पुरावे मिळतात. परंतु वारी त्यापेक्षा प्राचीन आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्थ आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास मोरे म्हणतात, वारी आदी शंकाराचार्यापासून सुरु झाली. पांडुरंग जेव्हा पांडुरंग आवतारात आले. तेव्हापासून वारी सुरु झाली. त्यानंतर पालखी सोहळा सुरु झाला. पुंडलिकामुळे विठ्ठल पंढरपूरमध्ये आले. त्यानंतर वारीची पद्धत सुरु झाली. परंतु हे कोणी घालून दिली त्याची काहीच माहिती नाही. एका सिद्धांतानुसार, वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली .

हे सुद्धा वाचा

विठ्ठल पंढरपुरात आले तरी कसे?

विठ्ठल आणि पंढरपूर यासंदर्भात तीन पुराणांमध्ये उल्लेख आला आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे. भगवान विष्णू रुसलेल्या माता रुख्मणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीरवन म्हणजे आजच्या पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक यांची आठवण झाली. भगवंत स्वत: मग पुंडलिक यांच्या दारी पोहचले. तेव्हा पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांना घरी कोणीतरी आले आहे, हे कळाले. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रम्ह भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले. भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते. मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक विट फेकली आणि देवाला म्हणाले, “या विटेवर उभा राहा. माझी आई-वडिलांची सेवा झाली की, मी तुमच्या दर्शनाला येतो.” भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. त्यानंतर आई-वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले. त्यांनी भगवंताची क्षमा मागितली. परंतु भगवंत तर आपल्या भक्तावर प्रसन्न झाले होते. त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले. भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावे, अशी विनंती केली. मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून, विठ्ठल बनून उभे राहिले. त्याच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी अन् कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरातून जातात.

वारकरी कोणाला म्हणतात?

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ‘महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत. परंतु ‘पंढरीची वारी’ ही प्रथा नाही. ती साधनाही नाही. तो एक उत्सव आहे. विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. पंढरपूरची वारी ही सामूहिक उपासना पद्धत आहे. विठ्ठलाची उपासना करणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात. वारीसोबत जाणारे वारकरी असतात. वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन्ही वेळा जाते. वारीसाठी हजारो लोक विविध गावांवरुन संतांच्या गावी एकत्र येतात. नाचत, गाजत, खेळत दिंडीत सहभागी होतात.

वारी अन् पालखी यामध्ये फरक काय?

महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संताना वगळून व्याख्या करता येणार नाही. वारी ही खूप जुनी परंपरा आहे. परंतु पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही. पालख्या संताच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरु केला. जगदगुरु नारायण महाराज यांनी सुरु केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पाईंट म्हणता येईल. त्यांनी वेगवेगळ्या गावावरुन जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या. त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. त्या वेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या. दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबा हे भजन सुरु झाले. 1685 पासून 147 वर्ष या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती. त्यानंतर1832 मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जावू लागल्या. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीस येतात.

महाराष्ट्रातून निघणाऱ्या महत्वाच्या पालख्या

राज्यभरातून 200 ते 250 पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावे आहेत. पालख्यांसोबत चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.

संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी निघते.

संत सोपनकाका पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव यांनी सासवड (जि. पुणे) येथे समाधी घेतली होती. त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते.

श्री संत मुक्ताई पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील कोथळी (ता.मुक्ताईनगर) हे त्यांचे समाधीस्थळ. त्या ठिकाणावरुन संत मुक्ताई यांची पालखी निघते. या पालखीतील वारकरी तब्बल 560 किलो मीटरचा पायी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना 33 दिवस लागतात.

संत एकनाथांचा पालखी सोहळा : संत एकनाथांची पैठण (छत्रपती संभाजीनगर) येथे कर्मभूमी आहे. त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघते.

संत गजानन महाराज यांची पालखी : शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो. सलग 31 दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते.

संत ज्ञानेश्वर यांची पालखी : श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी. त्या ठिकाणावरुन संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते. श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.

संत तुकाराम यांची पालखी : संत तुकाराम यांची पालखी देहू येथून निघते. संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटले जाते.

वारीतील आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा

भान हरपून खेळ खेळतो,

दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..

भक्तिने भारलेला रिंगण सोहळा

पाहावा ‘याचि देही याचि डोळा’

असे रिंगण सोहळ्यासंदर्भात म्हटले जाते. वारीतील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. वारीत मराठा सरदार सहभागी होत होते. त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरु केली. मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत होते. त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरु केला. त्यामुळेच एखाद्या लष्कारी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते. तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते. या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. त्यात दोन अश्व सहभागी होतात. यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो. त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर अश्व मोकळा सोडलो जातो. हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. त्यावेळी माउली, माउलीचा गजराने परिसर दुमदुमुन जातो. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो. या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररित्या धावतात.

वारीत बकरी रिंगणसुद्धा होते. संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे रिंगण होते. या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन पळतात. ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात.

वारीची व्यवस्था आणि अध्यात्मिक पातळीवर नेतृत्व

लाखो वारकरी शिस्तीने पंढरपूर जातात. कुठेही गोंधळ होत नाही. वर्षानुवर्ष चालणारी ही चोख व्यवस्था म्हणजे एक अभ्यासाचा विषय आहे. वारीची व्यवस्था संतांना समोर ठेऊन केली जाते. पालख्यांची व्यवस्था त्या त्या पालखीतील प्रमुख करतात. संत एकनाथ, संत तुकाराम महारांजांच्या वंशजाकडून त्यांच्या पालखीची व्यवस्था पहिली जाते. ज्ञानेश्वर महाराज पालखीची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून पाहिली जाते. या वारीचे कुटुंबप्रमुख छत्री ज्याच्या डोक्यावर ते असतात. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या डोक्यावर छत्र असते. तेच प्रमुख असतात. तसेच विणा ज्याच्या गळ्यात असते, ते विणेकरी भजनाचे नेतृत्व करतात. वारीसंदर्भात शासनाशी चर्चा करण्यासाठी विविध पदे तयार केली गेली आहे. ते शासनाच्या संपर्कात असतात. वारीत आलेल्या शेकडो दिंड्यांचे व्यवस्थापन त्या दिंडीच्या प्रमुखांकडून केले जाते.

वारीत लाखो लोक शिस्तीने चालत असतात. त्यासाठी वारकऱ्यांची पाच, पाचची रांगा असते. वारकरी कधी दिंडी ओलांडत नाही. ते पताकाच्या समोरुन जातात. अगदी शिस्तीने भजन करत, नृत्य करत त्यांची वाटचाल पंढरपूरच्या दिशेने होते. त्यांच्या जेवणाच्या वेळा, बसण्याच्या वेळा, तंबू लावण्याचा वेळा ठरलेल्या असतात.

निरोपाची रंजक परंपरा

वारीत निघाल्यावर 20 ते 25 दिवस व्यक्ती घरी येत नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींना काही निरोप द्यायचा असेल तर एक चांगली प्रथा होती. आता प्रत्येकाजवळ मोबाईल असल्यामुळे ती प्रथा मोडीत निघाली. पण पूर्वी कोणाचा काही निरोप आल्यावर त्या व्यक्तीचे नाव आणि दिंडी नंबर टाकला जात होतो. तो निरोपाचा कागद पोतदाराकडे दिला जात होता. पोतदार तो निरोप दिंडी प्रमुखाकडे घेऊन जात होता. दिंडी प्रमुख त्या व्यक्तीपर्यंत निरोप पोहचवत होता. पूर्वी पत्र लिहिण्याची सेवा करण्यासाठी सुशक्षित मुले असायची. ती वारकऱ्यांना पत्र लिहून देत होती. पण आता मोबाईल फोनमुळे सर्वच बदलले आहे.

वारीमध्ये महिलांचे स्थान

वारीत पुरुष, महिला असा कधी भेद नाही. महिलांना मानाचे स्थान आहे. वारकरी संप्रदायात नामदेव महाराज यांच्यानंतर जनाबाई यांनी फळ प्रमुख म्हणून काम केले. मुक्ताई यांची पालखी निघते. पहिल्या महिला लेखिका म्हणून मुक्ताईबाईचा उल्लेख करावा लागले, असे असे संत साहित्याचे अभ्यासक सचिन महाराज पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “मुक्ताबाई त्या काळात स्वत:च्या नावाने अभंग लिहीत होत्या. त्यांच्या साडेतीनशे वर्षांनी विदेशात कांदबरी एका महिलेने लिहिली. परंतु त्या कादंबरीला लेखक म्हणून पुरुषाचे नाव दिले होते. आपल्याकडे कीर्तन करणाऱ्या वारकरी महिला आहेत. वारकऱ्यांच्या मनामध्ये महिलांसंदर्भात कोणतीही वेगळी भूमिका नाही. वारीत जाणाऱ्या सर्वांना माऊली म्हटले जाते. वारीमध्ये महिला म्हणून कधी कोणाला नाकारला जात नाही”.

काय आहे त्या वारीत?

पंढरपुरात एक विठ्ठलाची मूर्ती आहे. त्या पांडूरंगच्या दिशेने राज्यभरातील सर्व जाती-धर्माचे लोक लाखोंच्या संख्येने चालत जातात. वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात अन् हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. वारीमुळे द्वेष, अहंकार बाजूला सरला जात आहे. अंतकरण शुद्ध होते. वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेच नाही. म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीने वारी करायलाच हवी…

भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.