भेट मिळाली, पण आशीर्वाद नाही, मनोज जरांगेंना भेटलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचं काय होणार?; पाटलांचा एक घाव अनेक तुकडे
मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. तेव्हा अनेक प्रस्तापीत नेत्यांचे देखील धाबे दणाणल्याचं पाहयला मिळालं. अनेक बड्या नेत्यांनी या काळात जरांगे यांची भेट घेतली.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील ठाम होते. मात्र जरांगे पाटील यांची ही मागणी काही मान्य झाली नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बैद्ध, मुस्लिम आणि मराठा आशी मोट बांधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज ऐनवेळी विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. तेव्हा अनेक प्रस्तापीत नेत्यांचे देखील धाबे दणाणल्याचं पाहयला मिळालं. त्याला कारण होतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल. जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असं मानलं जातं. त्यामुळे जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याची घोषणा करताच दिग्गजांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, यामध्ये सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून आलेले हसन मुश्रीफ असोत किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी समरजित घाडगे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली. उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, राधाकृष्ण विखे पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, धनंजय मुंडे या सारख्या अनेक बड्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेतल्या. अनेक नेते तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी इच्छूक होते.
मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार महाविकास आघाडी की महायुती, मात्र दुसरीकडे असंही दिसून येते की जरांगे फॅक्टर आधीच ओळखून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक मतदारसंघात मराठा उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. जरांगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा कोणाला फायदा होणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.