Pahalgam attack : पहलगाम हल्ल्याबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर, गेल्या वर्षभरापासून…
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला, या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला, या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जम्मू काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे.
जम्मू काश्मीरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेच्या 24 तासानंतर आता मोठा खुलासा झाला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला घडवून आणणारे दहशतवादी गेल्या एक वर्षापासून जम्मू काश्मीरमध्येच होते. याच दहशतवाद्यांनी 2024 मध्ये पुंछमध्ये वायु सेनेच्या ताफ्यावर देखील हल्ला केला होता.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2024 मध्ये या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर श्रीनगरच्या डाचीगाम जंगलात त्यांनी आश्रय घेतला. डिसेंबर 2024 मध्ये सुरक्षा दलानं या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं, मात्र त्यावेळी यातील तीन दहशतवादी पळून गेले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी जे दहशतवादी वाचले होते, त्यांनीच आता पहलगामध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. त्यांना पाकिस्तानमधून देखील मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे.‘अबू तालाह’ हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने पाकव्याप्त काश्मीरमधून या दहशतवाद्यांना हल्ल्याचा आदेश दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता डाचीगाम जगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, या जंगलामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे.
दरम्यान दुसरीकडे या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. अशा हल्ल्याला भारत घाबरणार नाही, दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर देऊ, दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की संपूर्ण जग बघेल, या हल्ल्याचे पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत, त्यांना देखील शिक्षा होणार असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.