Pahalgam Terrorist Attack : ‘कसं माहिती झालं की दहशतवादी पाकिस्तानातून आले?’ शंकराचार्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी
Kashmir Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात केव्हा पण युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर यांनी मोदी सरकारवर मोठा निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी बसली आहे

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रत्येकाच्या मनात असंतोष खदखदतोय. त्याचवेळी जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर यांनी मोदी सरकारवर मोठा निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याने वादाला फोडणी बसली आहे
काय म्हणाले शंकराचार्य?




स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वृत्तसंस्था ANI ला या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली. “सर्वात मोठी अडचण ही आहे की जेव्हा आपल्या घरात आपण चौकीदार ठेवला आहे आणि आपल्या घरात जर काही घटना घडली तर आपण सर्वात अगोदर कोणाला दोषी धरणार? सर्वात अगोदर चौकीदाराला पकडू, त्याला विचारू तू कुठे होता? ही घटना घडली कशी? पण येथे तर असं काहीच घडत नाहीये.” अशी घणाघाती टीका स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केली. “ते म्हणतात की आम्ही चौकीदार आहोत. पण जर ते खरंच चौकीदार असते तर कोणी असं आक्रमण केलं नसतं, असा हल्ला केला नसता.” अशी टीका पण त्यांनी केली.
दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय?
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सवाल केला की, “कोणी त्या दहशतवाद्यांना अटकावच केला नाही, त्यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ते आले. त्यांनी हल्ला केला आणि आरामात निघून गेले. कुठेच त्यांना त्रास झाला नाही. मग सहाजिकच प्रश्न येतो की चौकीदार कुठे होता?”

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
“चौकीदाराविषयी कुठेच काही चर्चा होत नाहीये. ते सांगत आहेत की, ते पाकिस्तानला धडा शिकवतील. पण दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, हे इतक्या लवकर कसं माहिती झालं? ही गोष्ट हा हल्ला घडण्यापूर्वी का नाही समजली? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” असे शंकराचार्य म्हणाले.
View this post on Instagram
सिंधूचे पाणी अडवण्यासाठी 20 वर्षे लागतील
भारत सरकारने सर्वात जुना सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्याचे जाहीर केले आहे. त्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले. तुम्ही पाणी अडवण्याचे जाहीर केले पण पाणी थांबवण्यासाठी अथवा ते दुसरीकडे वळवण्यासाठी तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारले तर ते सांगतील. तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे अशी काही व्यवस्था नाही. जर आज आपण काम सुरु केले तर कमीत कमी 20 वर्षे लागतील.