प्रत्येक भाषेचा सन्मान करा, संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं आवाहन
'टीव्ही 9 नेटवर्क'च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ आणि त्याच्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली. 100 वर्षांत संघात कोणकोणते बदल झाले, याविषयीही त्यांनी सांगितलं.

‘टीव्ही 9 नेटवर्क’च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कॉन्क्लेवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी देशात भाषेवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाषेचा वाद संपवण्याचं आणि संघ कोणत्याही भाषेविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
या कॉन्क्लेवमध्ये प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारलं गेलं की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उर्दूविरोधात आहेत, एम. के. स्टॅलिन हिंदीविरोधात आहेत. यावरून वेगळाच वाद सुरू आहे. तुमचं या वादावर काय मत आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना आंबेकर म्हणाले, “उर्दू एक भाषा आहे आणि जर कोणी भाषेला भाषेविरुद्ध उभं करू इच्छित असेल, जर कोणी कोणत्याही ओळखीला धार्मिक ओळखीशी जोडत असेल तर ते चुकीचं आहे. हा दृष्टीकोनाचा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही धार्मिक ओळखीशी जोडू शकत नाही.” विदेशी प्रभावातून जी धार्मिक कट्टरता निर्माण होते, त्याची प्रतिक्रिया उमटते. त्यामुळे समाजाने सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे, असं सुनील आंबेकर यांनी सांगितलं.




योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
समाजवादी पार्टीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या भाषांतरात उर्दूचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी व्यक्त केली होती. “हे लोक उर्दू शिकवून (इतरांच्या मुलांना) मौलवी बनवू इच्छितात. हे अजिबात मान्य केलं जाणार नाही,” असं ते म्हणाले होते.
‘किसी भाषा के खिलाफ होने की जरूरत नहीं है, भारत में जन्मी भाषा का सम्मान होना चाहिए’, TV9 के WITT समिट में बोले RSS के अखिल भारतीय प्रचार प्रमुख @SunilAmbekarM #TV9Network #WhatIndiaThinksToday #IndiainTheNewWorldOrder #TV9WITT2025 #RSS | @nishantchat pic.twitter.com/Wre1KGCaUu
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 29, 2025
भाषेविरुद्ध असण्याची गरज नाही- प्रचार प्रमुख
भाषेच्या वादाबद्दल सुनील आंबेकर पुढे म्हणाले, “कोणीही कोणत्याही प्रकारे भाषेच्या विरोधात असण्याची गरज नाही असं मला वाटतं. मूळ मुद्दा असा आहे की आपल्या सर्व मातृभाषा ज्या भारतात जन्मलेल्या भाषा आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. आजच्या काळात प्रासंगिकता काहीही असो त्यांचा उपयोग होतो. आपली मोठमोठी कामं त्या भाषेत करू शकू एवढं त्यांना सक्षम बनवलं पाहिजे. यासाठी समाज आणि सरकारने शक्य तितक्या माध्यमांतून काम केलं पाहिजे.”
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषेच्या वादाबद्दल ते पुढे म्हणाले, “तमिळ भाषेबाबत काय करता येईल याचा विचार सरकारने करावा. तिथे तमिळची जागा इंग्रजी घेईल याची काळजी करण्याची गरज आहे. तमिळ भाषेच्या उपयुक्ततेवर काय करता येईल ते करणं आवश्यक आहे.”