युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसोबत 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. अरमानच्या खासगी आयुष्याविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. अरमान मलिक असं नाव असल्याने तो नेमका कोणता धर्म पाळतो, असा प्रश्न अनेकांना आहे. अनेकजण त्याच्या व्लॉगवर कमेंट करत हा प्रश्न विचारताना दिसतात.
खुद्द अरमानने या प्रश्नाचं उत्तर एकदा दिलं होतं. अरमान हा मूळचा हरयाणातील हांसी इथला असून त्याचं खरं नाव संदीप असं आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या अरमानने लहानपणी बरेच दु:ख झेलले आहेत. जेव्हा तो दिल्लीत आला, तेव्हा त्याची भेट पायलशी झाली आणि दोघांनी लग्न केलं.
लग्नाच्या काही वर्षांनंतर अरमान हा पायलचीच खास मैत्रीण कृतिकावर प्रेम करू लागला. अखेर एकेदिवशी दोघांनी लग्न केलं आणि नंतर पायलला त्याविषयी सांगितलं. या दुसऱ्या लग्नावरून अरमान आणि पायल यांच्यात भांडण झालं होतं. इतकंच नव्हे तर ती मुलाला घेऊन घर सोडून गेली होती.
दीड वर्षे पतीपासून वेगळं राहिल्यानंतर पायलने कृतिकाचा सवत म्हणून स्वीकार केला. सध्याच्या घडीला अरमान त्याच्या दोन्ही पत्नी आणि मुलाबाळांसोबत एकत्र एकाच घरात राहतो. हिंदू धर्मात एकापेक्षा जास्त वेळा लग्न होऊ शकत नाही, मग अरमानने त्याचा धर्म बदलला का, असा प्रश्न अनेकांनी विचारला.
अरमानने एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं होतं. त्याने खुलासा केला होता की जेव्हा तो दिल्लीला आला, तेव्हाच त्याने संदीप हे नाव बदलून अरमान असं ठेवलं होतं. त्याचसोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलला नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. "मी नेहमीच हिंदू होतो, आहे आणि राहणार", असं उत्तर अरमानने दिलं होतं.
अरमानने असंही म्हटलं होतं की, "जे लोक माझ्या दुसऱ्या लग्नाला खोटं म्हणत आहेत आणि धर्म बदलण्याची गोष्ट करत आहेत ते लोक त्यांच्या आयुष्यात सुखी नाहीत. म्हणूनच ते माझ्याबद्दल असं सर्वकाही म्हणत आहेत." अरमान हा चार मुलांचा पिता आहे.