Aaditya Thackeray : होय, ते गद्दारच, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच
Aaditya Thackeray : आजचा उत्साह बघून एवढंच बोलतो हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे. गेलं महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली.

भिवंडी: शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी बंडखोरांवरील टीका सुरूच ठेवली आहे. आदित्य ठाकरे यांनी टीका करणं योग्य नसल्याचं बंडखोर वारंवार सांगत असतानाही आदित्य ठाकरेंकडून विरोधकांवर टीका सुरूच आहे. आजही त्यांनी भिवंडीत (bhiwandi) शिवसेनेच्या एका मेळाव्याला संबोधित करताना बंडखोरांवर टीका केली. त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी याची शिवसंवाद यात्रा भिवंडीत पोहोचली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी करत सत्ता मिळवली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उभे होते. काही झाले तरी आम्ही ठाकरे कुटुंबासोबतच राहू असा निर्धारच या शिवसैनिकांनी यावेळी केला.



तो विश्वास नाही, अंधविश्वास होता
मागच्या अडीच वर्षात आपलं सरकार असताना कोणताही धार्मिक भेदभाव न करता, जातीपातीचं राजकारण न करता विकासाची कामं करत आलो. महाराष्ट्राची 24 तास सेवा करत आलो. राजकारण कमी केलं ही आपली चूक झाली. आपण कधी राजकारण केलं नाही, सत्तेत असताना कधी विरोधकांना त्रास दिला नाही. स्वतःच्या आमदार, खासदारांवर नजर ठेवली नाही. ठेवला तो विश्वास आणि तो अंधविश्वास होता. तोच आज धोका देऊन गेला आहे. जे गेलेत त्यांच्यात शिवसेना कधीच नव्हती, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते बोलतात आम्ही उठाव केला, बंड केलं. पण त्यांनी गद्दारी केली, हा उठाव नाही. ते गद्दार आज उजळ माथ्याने फिरत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
गद्दारी पटणारी आहे का?
आजचा उत्साह बघून एवढंच बोलतो हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे. गेलं महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. पण ते आपल्याला सोडून गेले. गद्दारी केली. हे तुम्हाला तरी पटणारं आहे का? जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? असा सवाल त्यांनी केला.
निष्ठावंत आमच्यासोबत
यांना काय कमी केलं? कुटुंबाप्रमाणे वागवलं. आपली महिला आघाडी आहे, युवासेना आहे. सगळे आहेत. शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना अपचन झालं. ठाणे, पालघर, भिवंडीमध्ये ज्यांना जे जे देऊन बसलो, ते मस्त तिकडे आरामात बसले आहेत. त्या लोकांचं ऐकून आम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते निष्ठावंत लोक आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.