Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं

भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे (BJP Narayan Rane) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.

नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 6:49 PM

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे (BJP Narayan Rane) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह हे कोकणात आले होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मात्र राजकीय विश्लेषकांना या दाव्यामध्ये तथ्य वाटत नाही.

पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित आहे.  मोदींच्या मंत्रिमंडळाचा कोटा हा जवळपास 80 खात्यांचा आहे. मात्र सध्या 60 मंत्री स्वत:सह अन्य खात्यांचा भार वाहत आहेत.

राणेंबाबत चर्चा का? 

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची आदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो.

शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न ? 

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज आहे.

अरविंद सावंतांचं खातं कुणाला?

शिवसेना खासदार अरविंद सावंत हे मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालयाचं खातं सांभाळत होते. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची युती तुटली, त्यामुळे अरविंद सावंत यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी केंद्रातील मंत्रिपद सोडलं. तेव्हापासून त्या मंत्रिपदाचा भार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं ते मंत्रिपदही रिक्त आहे. या खातं महाराष्ट्राच्या वाट्याला द्यायचं झाल्यास तिथे राणेंचा नंबर लागतो का हे पाहावं लागेल.

‘राणे आणि त्यांच्या मुलांना सांभाळणे कठीण’

राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या मते, नारायण राणे यांच्या मंत्रिपदाच्या शक्यतेची बातमी आली असली, तरी त्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता कमी आहे. कारण नारायण राणे यांना मंत्रिपद देणं हे भाजपला न परवडणारं आहे. पक्षातील निष्ठावंतांना डावलून राणेंना मंत्रिपद देणं हे नाराजांना बळ देण्यासारखं आहे.  नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना सांभाळणं आणि त्यांचं उपद्रव मूल्य सहन करणं हे कोणत्याही पक्षासाठी कठीण आहे. त्यामुळे राणेंची मंत्रिमंडळात वर्णी याबाबत मला शंका वाटते, असं संजय आवटे म्हणाले.

VIDEO : नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं का? 

संबंधित बातम्या 

कट्टर शिवसैनिक ते कडवा विरोधक; खासदार नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द