पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या आखाड्यात, चुरस वाढली; काय आहे गणित?
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीचं पडघम वाजत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. येत्या 12 जुलै रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एक उमेदवार एक्स्ट्रा उतरवला गेल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला विधान परिषदेची संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
![पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या आखाड्यात, चुरस वाढली; काय आहे गणित? पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या आखाड्यात, चुरस वाढली; काय आहे गणित?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/sadabhau-khot-4.jpg?w=1280)
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. येत्या 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज अनेक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत कुणाचा पत्ता कट होणार आणि कोण निवडून येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकजा मुंडे यांच्यापासून ते मिलिंद नार्वेकर यांच्यापर्यंत अनेक उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील 5 जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. प्रत्येकी दोन जागांवर अजितदादा आणि शिंदे गटाने उमेदवार दिले आहेत. तर ठाकरे गटाने एक उमेदवार दिला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसनेही प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. शरद पवार गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील, सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे आणि भावना गवळीसारखे दिग्गज नेते निवडणुकीत उभे राहिल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
गणित काय?
या निवडणुकीत विजयासाठी 23 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार उतरल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सध्या काँग्रेसकडे 44, ठाकरे गटाकडे 16 आणि शरद पवार गटाकडे 13 मते आहेत. या मतांची एकूण टोटल 73 होते. मतांचा कोटा 23 चा आहे. त्यामुळे 73 संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना 24 मते मिळू शकतात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो. पण क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. क्रॉस व्होटिंग महायुती आणि महाविकास आघाडीत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील बरीचशी समीकरणे बदलली आहेत. आमदारांची मानसिकताही बदलली आहे. त्यामुळे सेफ गेम खेळण्यासाठी आमदारांकडून क्रॉस व्होटिंग केली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे. मात्र, कोणत्या आघाडीतील आमदार क्रॉस व्होटिंग करतील हे निकालाच्या दिवशीच दिसून येणार आहे.
भाजपचे 103 आमदार आहेत. 103 मतांमुळे भाजपचे केवळ चार आमदार निवडून येऊ शकतात. पण अपक्षांची साथ घेऊन पाचही उमेदवार निवडून आणण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अजितदादा गटाचे 42 आमदार आहेत. त्यांनाही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी चार आमदारांची गरज पडणार आहे. शिंदे गटाकडे आमदारांची एकूण संख्या 50 असून त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. महायुतीचा विचार केल्यास महायुतीकडे 195 आमदार आहेत. एवढ्या मतांमध्ये महायुतीचे फक्त 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. 9 उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला अजूनही 12 मतांची कमतरता आहे. एक उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला अपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे.
मैदानात कोण कोण?
भाजपचे उमेदवार
1) पंकजा मुंडे
2) परिणय फुके
3) सदाभाऊ खोत
4) अमित गोरखे
5) योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
1) शिवाजीराव गर्जे
2) राजेश विटेकर
शिवसेना
1) कृपाल तुमाने
2) भावना गवळी
शिवसेना – उबाठा
1) मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार
1) जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस
1) प्रज्ञा सातव