मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) अल्टिमेटम दिलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. गुढीपाडव्याची सभा असेल, ठाण्यातील उत्तर सभा असेल किंवा औरंगाबादेतील सभा असेल, या तिनही सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले. राज ठाकरेंच्या सभांच्या धडाक्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जाहीर सभेची घोषणा केलीय. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावेळी काय तो सवाल जवाब होऊनच जाऊदे असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलाय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेनं शिवसेनेला डिवचलंय. टोमणे सभेला अटी- शर्ती आहेत का?, अशी टीका वजा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंचं ट्विट
राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी,शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी,शर्ती आहेत का ?
मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का? आमचं सरकार आलx की मशिदींवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांचं स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.!,’ अशी टीका वजा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.
‘सवाल जवाब होऊनच जाऊ दे’
मुख्यमंत्री ठाकरे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रौप्य महोत्सवात 14 तारखेला सभा घेतोय, असं जाहीर केलंय. राज ठाकरे यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी थेट इशारा दिला होता. ’14 तारखेला सभा घेतोय. अजून किती दिवस ऐकणार? काय तो सवाल जवाब होऊनच जाऊ दे, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले की, राजकारणात देशाचे शत्रू बाजुला पडले आहेत. पण पक्षाचे शत्रू कोण कायकडे पाहिलं जातंय. घाणेरडं राजकारण सुरु झालंय. मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. पण मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच होईल हे माझं स्वप्न होतं. तसंच खासगीकरणाची खाज वाढत आहे. भविष्य अंधारात जाणार असेल तर आता तुम्ही कामाला लागणं पाहिजे. दमदार वाटचाल सुरु असताना आता थांबायचं नाही,’ असं राज ठाकरे यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता थेट इशारा दिला होता.