शिवसेना-वंचित युतीवर राष्ट्रवादीचे प्रथमच वक्तव्य
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही. परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे

मुंबई : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
नव्या मित्रांना विरोध नाही पण…
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही. परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
विधासभा पोटनिवडणूक
कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल असे सांगतानाच वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत. सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होती. त्या युतीची घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली.