‘नाचता येईना अन अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची गत, एसीबी कारवाईवरुन राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने (ACB) कारवाई केल्या प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केलाय.

अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने (ACB) कारवाई केल्या प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘नाचता येईना अन अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची गत आहे. कितीही दहशत निर्माण केली तरी सत्य लपणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडे नैतिकता शिल्लक असेल तर संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली (Radhakrishna Vikhe Patil criticize Thackeray Government over Sanjay Rathod case).
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राठोड प्रकरणी सगळे पुरावे समोर आहेत. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत पोलीस ज्या तत्परतेने गुन्हा दाखल करतात, इथं तर एका मुलीचा मृत्यू झालाय. ती आत्महत्या नसून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण तसं झालेलं नाही. पोलीस निर्ढावल्यासारखे वागत आहेत. पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर असं वागत आहेत? संजय राठोड यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. किंवा सरकारकडे नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी.”
“चित्रा वाघ याच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने (ACB) कारवाई केल्या प्रकरणी बोलताना विखे म्हणाले, “नाचता येईना अन अंगण वाकडं अशी राज्यसरकारची गत झालीय. त्यामुळे एसीबीचा धाक दाखवणं किंवा इतर पद्धतीने भीती दाखवण्याचा प्रकार आहे. पण सरकारने कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही,” असंही मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं.
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ठाकरे सरकार गंभीर नाही”
राधाकृष्ण विखे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षाची मागणी आहे. राज्यात येणारं प्रत्येक सरकार सांगतं प्रस्ताव पाठवला. सरकारची इच्छाशक्ती आहे का हाच प्रश्न आहे. मराठा आरक्षणासारखंच सरकार कोणत्याच बाबतीत गंभीर नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीही राज्य सरकार गंभीर नाही.”
हेही वाचा :
शेतकरी आत्महत्येस सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार : राधाकृष्ण विखे
व्हिडीओ पाहा :
Radhakrishna Vikhe Patil criticize Thackeray Government over Sanjay Rathod case