“देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा”, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “गुहेत जाऊन…”
देशाच्या पंतप्रधानालाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
![देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले गुहेत जाऊन... देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले गुहेत जाऊन...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Sanjay-Raut-on-Narendra-modi.jpg?w=1280)
Sanjay Raut on Hathras stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भोलेबाबांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंतर संपू्र्ण भारतात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
“पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा”
“या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. भोंदूगिरी तिथूनच सुरु होते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तर मग तसेच वागा ना. गुहेत जाऊन तपस्या करुन स्वत:ला बाबा महाराज म्हणून घ्याल. तुम्ही स्वत:ला देवाचा अवतार म्हणाल. मी बायोलॉजिकल पद्धतीने जन्माला आलो नाही. तुम्ही हिंदू-मुसलमान कराल. ही भोंदूगिरीच आहे. ही बुवाबाजी आहे. देशाच्या पंतप्रधानालाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“मोदींना मिळालेली मते भोंदूगिरीतून”
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदार घेऊन आसामला जातात. कामाख्या देवीकडे रेडे कापतात, यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला. कायद्याने यांच्यावर का कारवाई होत नाही. जिथे जिथे अंधश्रद्धा आहे, जिथे जिथे बुवाबाजी आहे तिथे तिथे आमचे राज्यकर्ते जातात, मग ते प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील. त्यामुळे यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. अनेक लोकं हतबल झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, गरिबी, लोकांचे प्रश्न आहेत आणि लोक भोंदू लोकांकडे जातात. नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते ही भोंदूगिरीतून मिळालेली आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Mukhyamantri-Majhi-Ladki-Bahin-Yojana.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Devendra-fadnavis.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Ganpati-Festival-2024.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Nagpur-hit-and-run-case-uodate.jpg)
“सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा”
खारघरचा विषय आता सरकारने मागे टाकला आहे. खारघरला जे साधक मरण पावले, हे अत्यंत दुर्दैवी होतं. गृहमंत्री, मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे उपस्थित होतं. पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. SIT नेमणं हे फक्त धुळफेक असते, अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नेमते तेव्हा ती धूळफेक असते. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, मी तर म्हणतो सरकार आहे, सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, असेही संजय राऊत म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो साधक जमले, आत त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हत. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून ती धावपळ झाली. हाथरस प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे ज्याच्यामुळे हे घडलं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही कारण त्याला राजकीय संरक्षण आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.
“अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालतात”
तसेच 80 हजार लोकांना परवानगी असताना अडीच लाख लोक तिथे कशी जमली. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत. त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात, असेही संजय राऊत म्हणाले.