‘सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली, नाकर्त्यांचा दुतोंडीपणा उघड’, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर निशाणा
सातारा शहरासाठी ग्रेड सेपरेटर, कास धरणाची उंची, तसेच बामनोली पर्यटनाबाबत वॉटर स्पोर्ट प्रकल्पाबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. याचा समाचार घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवेंद्रराजे घेत असलेल्या श्रेयाबाबत टीका केलीये.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांच्यात नगरपालिकेच्या विकासकामांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघांमध्ये सातारा शहरात झालेल्या विकास कामांमध्ये श्रेयवाद सुरू झालाय. सातारा शहरासाठी ग्रेड सेपरेटर, कास धरणाची उंची, तसेच बामनोली पर्यटनाबाबत वॉटर स्पोर्ट प्रकल्पाबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानले आहेत. याचा समाचार घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक काढून शिवेंद्रराजे घेत असलेल्या श्रेयाबाबत टीका केलीये.
उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका
सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली. नाकर्त्यांचा दुतोंडीपणा उघड. प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन कसे केले, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमारतीसाठी रुपये 10 कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत. ते दुतोंडी असल्यानेच त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. गेल्या 5 वर्षात एक तरी मोठे काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे, आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल असे भाष्य करीत आहेत. गेल्या 5 वर्षात साविआने लोकहिताची कामे सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून कामे केली आहेत. प्रत्येक ठिकाणी व स्तरावर विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
त्यांच्याकडे 40 वर्षे सत्ता असताना जे काही व्हायला पाहीजे होते ते कधीच झाले नाही. त्यामुळे साविआने केलेल्या कामांचा धसका घेवून, दुतोंडी भुमिका यांना घ्यावी लागत आहे दुतोंडी आणि स्वार्थी असणाऱ्या बाजारबुणग्यांची कुजकट दुर्घंधी युक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतुन बाहेर काढून दूर फेकून दिली आहे. त्यावेळी नाक देखिल कापले गेले तरी सुध्दा भोके आहेत असे म्हणत वर तोंड करुन ते फिरत आहेत. हे दुटप्पी राजकारणी साविआच्या कामाचे अभिनंदन करुन, आपणच निधी आणला अश्या दुटप्पी अविर्भावात आहेत.
‘बैल गेला आणि झोपा केला अशी यांची अवस्था’
ज्यावेळी नगरपरिषदेने प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे दिल्यावर, आम्ही नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना सुमारे सहा महिन्यांपूर्वी समक्ष भेटलो. वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन निधी देण्याची ग्वाही मिळवली. त्यानंतर वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन दोन महिन्यांपूर्वी 10 कोटींची पहिल्या टप्याची तरतूद झाली.त्याचे आदेश साधारण आठ ते दहा दिवसापूर्वी अगोदरच्या तारखेचे प्राप्त झाले. त्यानुसार आम्ही प्रसिध्दी माध्यमांव्दारे, ना. एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करीत, सातारकरांना प्रसार माध्यमांव्दारे प्रशासकीय इमारतीची विस्तृत माहीती सुध्दा दिली. आता हे फुकटचे फौजदार 10 कोटींबद्दल संबंधीत मंत्री यांचे इतक्या उशिरा आभार-अभिनंदन करीत आहेत. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी यांची अवस्था आहे. यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. जनतेच्या तव्यावर आपल्या पोळ्या भाजुन घ्यायच्या आहेत. सहकारी संस्था झाल्या, कारखाना चावून-चावून दात आणि कारखाना दोन्ही बोथट व्हायला लागलेय, त्यातच सभासद जागा होत आहे, त्यामुळे दुसरे आयते कुरण म्हणून ते निव्वळ स्वार्थासाठी नगरपरिषदेकडे पहात आहेत.
‘अजित पवार यांनी सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले’
अजित पवार यांनी चांगल्या कामाकडे बघुन, सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले आहे. लोकहिताच्या कामासाठी, त्यांनी वेळोवेळी मंजू-या, निधी दिला आहे. त्यांचे लोकदायित्व ते पार पाडत आहेत. परंतु यांचे तोंड बघितल्यावर ना.अजित पवार यांनी पैसे दिले असा डांगोरा हे स्वतः पिटत आहेत. तुम्ही तुमचा मुखडा दाखवल्याने ना.अजित पवार यांनी निधी दिला हे जर खरे असेल तर फक्त एखाद-दुस-या कामासाठीच तुम्ही तुमचे सुमूख किंवा कुमूख किंवा जे काय असेल ते का दाखवले ?
सातारकरांसाठी अधिक वेळा त्यांचे मुख त्यांनी दाखवून, ना. दादांकडून अधिक कामे-निधी का मंजूर करुन घेतली नाहीत? असे साधे-सरळ प्रश्न सामान्य सातारकर विचारत आहेत. निधी देण्यासाठी प्रस्ताव लागतो, तो सक्षम लागतो, तांत्रिक, प्रशासकीय मान्यता लागते, कोणाचे तोंड बघुन निधी कोणीच देत नाही ही साधी बाब सुध्दा त्यांना समजत नाही हे स्पष्ट होत आहे.
अर्थात तुम्ही स्वार्थ असल्यावरच तोंड दाखवणार, सामान्य जनतेसाठी कधी तुम्ही तुमचे मुख दाखवणारही नाही आणि उघडणारही नाही हे तितकंच खरं आहे, असे आम्ही नव्हे तर सातारकर आता म्हणत आहेत. सातारा विकास आघाडीची कामाची एक पध्दत आहे. सर्वसामान्य सातारकरांचा चौफेर विकास हे साविआचे धोरण आहे. त्यासाठी लागेल ते करायची जिद्द आणि चिकाटी आहे. सातारा विकास आघाडी सातारकरांची घरची आघाडी आहे.
‘उपसुन, फेकून दिलेली घाण पुन्हा कधीच नको’
नवीन प्रशासकीय इमारत, नगरपरिषदेच्या पॉवर हाउस येथे विज निर्मिती, शहापूर पाणी पुरवठा योजना सोलर वीजेवर चालवणे (प्रस्तावित), कचरा कुंडी मुक्त शहर, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडया, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सोनगांव येथे सेग्रीगेशन, पाण्याचा पुनर्वापर करता येण्यासाठी भुयारी गटर योजना, आवास योजना, घरकुल योजना, आयुर्वेदिक गार्डन सह विविध बगिचांचा विकास, कास धरण उंची वाढवणे, पाणीपुरवठा सक्षम वितरणासाठी उच्य क्षमतेच्या टाक्या, अग्नीशमनासाठी नवीन फायर ब्रिगेड वाहन, अग्नीशमनाची अद्यावत उपकरणे, नगरपरिषदेचा स्वतःचा जेसिबी, नवीन टिपर, आयडीएसएमटी आणि युआयडीएसएमटी अंतर्गत व्यापारी संकूले, गोडोली येथील प्रा.आरोग्य केंद्राचा विकास, पू.कस्तुरबा रुग्णालयाची नवीन इमारत व तेथिल प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध समाजमंदीरे, व्यायामशाळा, अशी कितीतरी विकास कामे फक्त आणि फक्त साविआने मार्गी लावलेली आहेत. आता तर हद्दवाढ सुध्दा झाली आहे. त्यामुळे आयत्या रेघोटा मारणा-या बाजीरावांना सातारा पालिकेच्या पाय-या सुध्दा दिसू नयेत अशी भुमिका समस्त सातारकरांनी घेतली आहे. उपसुन, फेकून दिलेली घाण पुन्हा कधीच नको असेच सातारकर आता म्हणत आहेत.
‘सगळीकडचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणार’
तुमचा सगळीकडचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणार आहे, त्याच्या कागदपत्राची सुरळी चांगलीच ठासणार आहे त्यामुळे येत्या काही काळात, कागदपत्रांची सुरळी करा म्हणणा-यांची दातखिळ बसलेली पहायला मिळणार हे निश्चित आहे. एकंदरीत श्रेयासाठी धडपडणारी नविआ म्हणजे नकारात्मकता आहे. नगरविकास आघाडी एका नगराची म्हणजेच पडतळीत जागा घेवून, त्यातील प्लॉट विकणा-या विशिष्ट कंपूची आहे. नविआचे मुळातच असलेले नगण्य अस्तित्व दाखवण्यासाठी यांची ही फुकटची फौजदारी आणि बाजीरावकी चालू आहे.
इतर बातम्या :