देवाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी… अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने मध्यरात्रीपासूनच मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने राज्यातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये भाविकांचा महापूर ओसंडून वाहत आहे. मध्यरात्रीपासूनच जागृत देवस्थानामध्ये जाऊन भाविकांनी पूजा अर्चा करत विघ्नहर्त्या गणेशाचं दर्शन घेतलं आहे. या निमित्ताने मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अंगारकी संकष्टी गणेश चतुर्थीनिमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक आले आहेत. पूजा, आरती करत देवाला साकडे घातली जात आहेत. यावेळी सामूहिक आरतीही करण्यात येत आहे. पहाटेपासूनच भाविक विविध मंदिरात दाखल झाले. प्रत्येकजण रांगेत उभा राहून देवाचं दर्शन घेत होता. कोणतीही गडबड आणि गोंधळ न करता हे भाविक गर्दीतून मार्गक्रमण करत होते.
मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा भाविक लाभ घेत होते. तर सकाळी 3.15 वाजता मंदिरात काकड आरती करण्यात आली, अशी माहिती मंदिर ट्रस्टी आरती साळवी यांनी दिली. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने सिद्धिविनायक मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं. दिव्यांची आरासही करण्यात आली होती.
बीडच्या दक्षिणमुखी मंदिरात तोबा गर्दी
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी गणेश मंदिरात आज अंगारकी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परळी पंचक्रोशीत दक्षिणमुखी गणेश मंदिर हे जाज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते, त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटले जाते. ही अंगारकी संकष्टी विशेष अशी आहे. सर्व संकष्टींमध्ये तिचे महत्त्व अधिक मानले जाते. ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक अशी मानली जाते. त्यामुळे तिचे माहात्म्य अधिक मानले जाते. त्यामुळेच आज मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांनी ओसंडून गेला होता.
सांगलीत भक्तांचा महापूर
सांगलीमध्ये आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश भक्तांनी मुख्य गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यंदाच्या वर्षातील ही पहिली आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त सांगलीतील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट सुद्धा संस्थांनकडून करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याने सुरक्षा व्यवस्था आणि होमगार्डची नियुक्ती मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पहाटे 5 वाजल्यापासून सांगलीतील गणेश भक्त मुख्य गणपती मंदिरामध्ये आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी येत आहेत.
जळगावात राज्यभरातून भाविक
जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्ताने राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या वर्षातील ही पहिलीच आणि शेवटची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती विराजमान आहेत. देशातल्या गणपतीच्या अडीच पीठांपैकी एक म्हणून पद्मालय येथील गणपतीची ओळख आहे. प्राचीन आणि जागृत देवस्थान असल्यामुळे दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात गर्दी झाली आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
ओझरमध्ये विशेष पूजा
अष्टविनायक गणपतींपैकी महत्त्वाचे आणि सर्वात श्रीमंत गणपती अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरचे विघ्नहर गणपती मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून खुले करण्यात आले. पहाटे 5 वाजल्यापासून या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. ही गर्दी अजूनही ओसरताना दिसत नाहीये. पहाटेच देवस्थान ट्रस्टने विघ्नहर्त्याला अभिषेक घालून पूजा केली. यावेळी ‘गणेशयागाचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 65 जोडप्यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे आज विघ्नर्त्याचे सर्व दागिने परिधान करण्यात आले होते. मंदिरात झेंडूची फुलांची आरास करण्यात आली आहे. तर आंबे,केळी आणि पपईच्या महाप्रसादाची सजावट करण्यात आली आहे.
फुलांची सजावट आणि पहारा
अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला विविध रंगी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यता आला आहे.
दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात
रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यातही आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तब्बल 1 ते दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात आल्याने संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. केवळ कोकणातूनच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आले आहेत. 2024मधील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे. पाऊस असून देखील भाविकांचा दर्शनासाठी उत्साह पाहण्यासारखा आहे. या वर्षातील केवळ एकाच अंगारकी चतुर्थीचा योग आहे. त्यामुळे मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांनी गणपतीपुळ्यात मोठी गर्दी केली आहे. पहाटे साडे तीन वाजल्यापासून भाविकांना गणरायाचं दर्शन देण्यात आलं.