T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या होणार टीम इंडियाचा कॅप्टन? बीसीसीआय सचिव जय शाह यांचे संकेत
T20 World Cup 2024: रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने त्यानंतर निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता टीम इंडियाला लवकरच नवा कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
![T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या होणार टीम इंडियाचा कॅप्टन? बीसीसीआय सचिव जय शाह यांचे संकेत T20 World Cup 2024: हार्दिक पंड्या होणार टीम इंडियाचा कॅप्टन? बीसीसीआय सचिव जय शाह यांचे संकेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/hardik-pandya-jay-shah-and-rohit-sharma.jpg?w=1280)
टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न हे 17 वर्षांनी पूर्ण झालं. टीम इंडियाने 2007 नंतर यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला लोळवत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेत अजिंक्य राहिली. टीम इंडियाने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खेळलेल्या एकूण 8 सामन्यात विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचा टी 20I मधील 50 विजय ठरला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20I क्रिकेटला अलविदा केला. त्यामुळे आता टी20 टीमचा कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा रंगू लागली आहे. बीसीसीआयला लवकरच नव्या कॅप्टनची घोषणा करावी लागणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या भविष्यातील प्लानबाबत सांगितलं.
जय शाह यांनी टी 20 वर्ल्ड कपनंतर पुढील लक्ष्य काय असणार हे सांगितलं. “टीम इंडियाने आता सर्व ट्रॉफी जिंकायला हवं, अशी माझी अपेक्षा आहे. टीम इंडिया ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकणं आमचं लक्ष्य आहे.” तसेच संघाला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी खेळाडूही असतील”, असं जय शाह यांनी सांगितलं.
हार्दिक पंड्याला होणार कॅप्टन?
आता टीम इंडियाचा कॅप्टन कोण होणार? या प्रश्नावर जय शाह यांनी उत्तर देताना हार्दिक पंड्याच्या कामगिरीचा उल्लेख केला. त्यामुळे हार्दिक पंड्याला टीम इंडियाची सूत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जय शाह यांनी हार्दिक पंड्याच्या टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरीचा उल्लेख केला. “कॅप्टन्सीबाबत निवड समिती निर्णय करेल. हार्दिकने स्वत:ला सिद्ध केलंय. तसेच आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे”, असं जय शाह म्हणाले. तसेच कर्णधार म्हणून हार्दिक पंड्यासह सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या दोघांच्या नावाचीही चर्चा आहे. कारण या दोघांना कॅप्टन्सीचा अनुभव आहे. त्यामुळे आता या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडते,याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान आता वर्ल्ड कप विजयी संघांचं भारतात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. मात्र टीम इंडिया बारबाडोसमध्येच आहे. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपसह बुधवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.