मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सने (GT) किताबी लढतीत राजस्थान रॉयल्सचा (RR) धुव्वा उडवून विजेतेपद पटकावले आहे. मात्र, सोशल मीडियावर जरा वेगळंच चित्र दिसतंय. एकतर्फी फायनलनंतर सोशल मीडियावर फिक्सिंगचा (IPL Match Fixing) ट्रेंड सुरू झालाय. तुल्यबळ संघांमध्ये अपेक्षेप्रमाणे लढत न रंगल्याने क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. त्यानंतर मीडियावर सामना फिक्स असल्याच्या पोस्टचा महापूर सुरू झालाय. विशेष म्हणजे अनेक गंमतीशीर मिम्स देखील सोशल मीडियावर दिसून येतायेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. त्यानंतर सामन्यावर फिक्सिंगच्या आरोपाला सुरुवात झाली. गुजरातने लक्ष्याचा पाठलाग करताना नऊ पैकी आठ लढती जिंकलेल्या असताना सॅमसनने कशी काय आधी फलंदाजी घेतली. यावरुन हा सगळा वादंग सुरू झाला. यामुळे चाहते तर नाराज झालेच पण सोशल मीडियावर चांगलाच संतापही व्यक्त केला.
राजस्थानकडे खोलवर फलंदाजी असतानाही त्यांना 130 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. स्पर्धेत चार शतके आणि तितकीच अर्धशतके ठोकणाऱ्या जोस बटलची जादू अंतिम लढतीत चालली नाही. युझवेंद्र चहलने शुभमन गिलचा शून्यावर सोपा झेल सोडल्याने पुन्हा फिक्सिंगचा सूर आळविण्यात आला. त्यामुळे याला धरून सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील दिसून आले. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने फायनलमध्ये 10.66च्या इकोनॉमी रेटने दिलेल्या धावा देखील नेटिझन्सला चांगल्याच खटल्या आहेत. त्याने तीन षटकांत एकही बळी न टिपता 32 धावा दिल्या आहेत. अश्विनसह रेयान परागनेही खराब क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल असल्याने गुजरात संघाला विजय बहाल करण्यात आला, असा आरोपही नेटिझन्सकडून करण्यात आलाय. त्यामुळे सोशल मीडियावरही चर्चेत किती तथ्य आहे. हे आता आयपीएलच्या जबाबदार मंडळींनाच ठाऊक.
आपीएलमध्ये कथित मॅच फिक्सिंगआणि सट्टेबाजीचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात सीबीआयनं तीन जणांना अटक केली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सीबीआय अधिकऱ्यांच्या हवाल्यानं त्यावेळी ही बातमी समोर आली होती. एक रॅकेट भारतीय टी 20मध्ये कथितपणे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी आहे, असं त्यात म्हटलं होतं. या रॅकेटसंदर्भात पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीवरुन सीबीआयने कारवाई त्यावेळी केली होती.