राहुल-जाडेजाची अर्धशतकं, रॉबिन्सनचा ‘पंच’, 278 धावांत भारताचा डाव संपुष्टात, 95 धावांची आघाडी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव 278 धावांमध्ये गुंडाळला.

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव 278 धावांमध्ये गुंडाळला आहे. भारताकडून सलामीवीर के. एल. राहुलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर रवींद्र जाडेजानेदेखील (56) अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने भारताचे 5 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने 4 गडी बाद केलं. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांत गुंडाळल्यामुळे भारताला 95 धावांची आघाडी मिळाली आहे. (IND vs ENG : India all out on 278 runs gets lead of 95 runs in Nottingham test)
दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय निर्माण केला होता. खराब वातावरण आणि पावसामुळे सामना लवकर थांबवण्यात आला होता. तर या सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला होता. कारण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 183 धावांवर रोखलं होतं. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली ठरली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल मैदानावर तग धरुन खेळत होते. पण लंचब्रेक आधीच्या षटकात रोहित शर्मा बाद झाला. भारताची 97 धावावर रोहित शर्माच्या रुपात पहिली विकेट पडली.
आज भारताने 154 धावा जोडल्या
लंचब्रेक नंतर भारतीय संघाला उतरती कळाच लागली. कारण काही धावांच्या अंतरावर भारताचे एकामागे एक असे मातब्बर शिलेदार तंबूत परतताना दिसले. विशेष म्हणजे इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याने कर्णधार विराट कोहली याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यानंतर बेअरस्टोने अजिंक्य राहणे याला धावबाद केलं. एकीकडे विकेट पडत होत्या दुसऱ्या बाजूने के. एल. राहूल एका बाजूने कमान सांभाळण्याच्या प्रयत्नात दिसला. तो ऋषभ पंतसोबत डाव सावरण्याचा प्रयत्नात होता पण पावसाने खेळात व्यत्यय आणला. अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 4 बाद 124 पासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. आज पहिल्या दोन सत्रात भारताने 6 गड्यांच्या बदल्यात 154 धावा जोडल्या.
जाडेजा-बुमराहची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी
आज रिषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह या तिघांची फटकेबाजी आणि लोकेश राहुलच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने 156 धावा जोडल्या. या चौघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार वेळ खेळपट्टीवर टिकून खेळला आलं नाही. तर सलामीवीर रोहित शर्माला चांगला स्टार्ट मिळूनही मोठी खेळी करता आली नाही.
रॉबिन्सन-अँडरसनची टिच्चून गोलंदाजी
भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनीदेखील चांगली गोलंदाजी केली. त्यातही प्रामुख्याने ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन या दोघांनी तिखट मारा केला. रॉबिन्सनने भारताचे 5 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने 4 भारतीय फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
संबंधित बातम्या
विराट कोहलीचा धुरंदर, 46 चेंडूत ठोकलं शतक, नंतर दारुच्या नशेत संपवलं करीयर
(IND vs ENG : India all out on 278 runs gets lead of 95 runs in Nottingham test)