Yashasvi Jaiswal : किट बॅगला लाथ मारण्यापर्यंत भांडण, यशस्वीने ‘या’ खेळाडूमुळे सोडली मुंबईची टीम, मोठा खुलासा
Yashasvi Jaiswal : आयपीएल दरम्यान यशस्वी जैस्वालच्या या निर्णयाने सगळेच हैराण झालेत. यशस्वी जैस्वालने मुंबईची टीम सोडण्याचा निर्णय का घेतला? त्यामागच्या कारणांचा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. पुढच्या रणजी सीजनमध्ये यशस्वी जैस्वाल नव्या टीमकडून खेळताना दिसेल.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने 1 एप्रिलला मुंबई क्रिकेट असोशिएशनला पत्र लिहिलं. त्याने पत्रात मुंबईची टीम सोडून गोव्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई क्रिकेट असोशिएशनने लगेच त्याची विनंती मान्य केली. म्हणजे आता देशांतर्गत क्रिकेट सीजन 2025-26 मध्ये तो गोव्याकडून खेळताना दिसेल. त्याला गोवा टीमच कॅप्टन सुद्धा बनवलं जाऊ शकतं. जैस्वाल म्हणाला की, चांगल्या संधीमुळे त्याने हे पाऊल उचललं. आयपीएल दरम्यान यशस्वी जैस्वालच्या या निर्णयाने सगळेच हैराण झालेत. यशस्वी जैस्वालने मुंबईची टीम सोडण्याचा निर्णय का घेतला? त्यामागच्या कारणांचा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. यशस्वी जैस्वालचे मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत मतभेद आहेत. बऱ्याच काळपासून हा अंतर्गत वाद धुमसत होता. त्यामुळे जैस्वालने मुंबईची टीम सोडण्याचा निर्णय घेतला.
यशस्वी जैस्वालने फक्त गोव्याची कॅप्टनशिप मिळेतय म्हणून नाही, तर मुंबईच्या सेटअपला कंटाळून त्याने हा निर्णय घेतला. इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. मॅनेजमेंटकडून सतत टाकला जाणार दबाव यामुळे यशस्वी खुश नव्हता. मॅनेजमेंट शिवाय मुंबईच्या फर्स्ट क्लास टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणेसोबत त्याचे संबंध चांगले नव्हते. दोघांमध्ये तीव्र मतभेद होते, त्याची सुरुवात 2022 मध्ये झालेली, असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय.
जैस्वालला मैदानाबाहेर पाठवलं होतं
अजिंक्य रहाणेने एका मॅचमध्ये स्लेजिंग केल्यानंतर जैस्वालला मैदानाबाहेर पाठवलं होतं. मैदानावर शिस्तभंग केल्याबद्दल अजिंक्य रहाणेने हे पाऊल उचललं. जैस्वाल साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजाला स्लेजिंग करत होता. रहाणेला वाटलं की, यशस्वी मर्यादा ओलांडतोय. या शिक्षेनंतर जैस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये 323 चेंडूत 30 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 265 रन्स फटकावले होते.
जैस्वालच्या कटिबद्धतेबद्दल प्रश्नचिन्ह
मागच्या देशातंर्गत सीजनमध्ये मुंबई आणि जम्मू-काश्मीरमध्ये रणजी सामना झाला. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा दोघे खेळले. या मॅचमध्ये जैस्वालने खराब प्रदर्शन केलं. जम्मू-काश्मीरच्या टीमने मुंबई विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्यानंतर टीम मॅनेजमेंटने यशस्वीवर टीका केली होती. कोच ओमकार साळवी आणि कॅप्टन अजिंक्य रहाणेने मुंबईच्या टीमप्रती जैस्वालच्या कटिबद्धतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
किटबॅगला लाथ मारली
यशस्वी जैस्वालला ही गोष्ट आवडली नाही. त्याने रागात कॅप्टन रहाणेच्या किटबॅगला लाथ मारली होती. इथेच प्रकरण आणखी बिघडलं, चिघळलं. अखेरीस यशस्वी जैस्वालने टीम सोडण्याचा निर्णय घेतला. दोन सीजनआधी जैस्वाल सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत होता. त्यावेळी मॅनेजमेंटकडून त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला असं वाटलं की, आपल्याला टार्गेट केलं जातय.