भाजपनं कंगना रणौतला झापलं; ‘त्या’ वक्तव्यानंतर पक्षाचं अधिकृत पत्र जाहीर, बघा काय म्हटलं ?
“भाजप खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना रणौतच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती दर्शविली आहे. पक्षाच्या वतीने, कंगना रणौतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही”, असं भाजपने म्हटलं आहे.
“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. नाहीतर तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोकं काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य कंगना रणौतने केलं. यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कंगना रणौतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. कंगना रणौतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत आहे. तर कंगना रणौतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी कोणताच संबंध नाही, असं भाजपने आपल्या जाहीर केलेल्या अधिकृत पत्राद्वारे म्हटलं आहे. इतकेच नाहीतर कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाकडून तिला चांगलंच फटकारण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन करणं अनिवार्य आहे, असं भाजपने स्पष्ट केलं आहे.