नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची केंद्रात तक्रार, छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले…
भाजपा नेते नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नितेश राणेंची भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
नितेश राणेंनी सांगलीतून पुन्हा एकदा भडकावू भाषण केलं. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुस्लमान… अशी चिथावणी नितेश राणेंनी दिली आहे. अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केली आहे. दरम्यान, यावर मंत्री छगन भुजबळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता त्यांनी स्पष्टपणे भाष्य करत वाचाळवीरांचे कान टोचले आहे. “मला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना एवढच सांगायच आहे की, महायुतीची मत वाढली पाहिजेत, यासाठी आपण बोलू. महायुतीची मतं वाढवता येत नसतील, तर आपल्या बोलण्याने परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी” असं छगन भुजबळ म्हणाले. “महायुतीची सत्ता आली पाहिजे ही अजितदाद, नितेश राणे, नारायण राणे, माझी सगळ्यांचीच इच्छा आहे. आपण बोलताना विचार करुन बोललं पाहिजे. अनेक आमदार आहेत, त्यांना वेगवेळ्या समाजाचे लोक मतदान करतात. सरकार यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. सगळे आमदार चांगल्या मतांनी निवडून आले पाहिजेत. त्यांच्या मतांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी” असं छगन भुजबळ म्हणाले.