Lakhpati Didi Yojana : देशातील 3 कोटी तर राज्यातील ‘इतक्या’ महिलांना लखपती बनवणार, अजित दादांची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगावात असलेल्या लखपती दिदी योजनेचा श्री गणेशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दमदार स्वागत केले.
जळगावात प्रथमच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या जंगी स्वागतावर अजित दादा यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं असे मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून स्वागत केल्याचे पहिल्यांदाच पाहत आहे, अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्टं आहे. आपण महाराष्ट्रात ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच दिशेने आपण प्रवास करूया असेही पवार यांनी सांगितले. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, जळगावातील कानकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला पंतप्रधानांना भेटायला आल्या. तुमचा उत्साह पाहून तुम्हाला सलाम केला पाहिजे. राज्याने महिलांना मान दिला आहे. सन्मान दिला आहे. सबल आणि सक्षम केलं आहे. महिला सक्षम होत आहेत. आपणही काही योजना आणल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.