पंढरपूर, २९ ऑक्टोबर २०२३ | पंढरपूर तालुक्यातील 45 गावामध्येही राजकीय पुढार्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील 45 गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने मराठा समाज आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. आरक्षणासाठी मराठा बांधव एकवटला असून आरक्षण न मिळाल्यास तालुक्यातील 102 गावांमध्ये गाव बंदीचे फलक लावले जातील. तसेच राजकीय नेते आणि आमदारांना श्री विठ्लाचे दर्शन घेवू देणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. तर लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा बांधवांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाचे काही टप्पे ठरवले आहेत. त्यापैकीच साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर करणं हा एक टप्पा आहे.