Koyna Dam : धरणाच्या पाणीपातळीत वाढ, कोयना नदीत 21 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाची साठवण क्षमता ही 105 टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण पूर्णपणे भरुन अधिकचा धोका निर्माण होऊ नये म्हणून वाढती आवक पाहताच विसर्ग सुरु केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही धरणात 93.87 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच 87.19 टक्के धरण भरले असल्याने पु्न्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

कराड: राज्यात पाऊस ओसरला असला तरी नदी, नाले, ओढे आणि लहान-मोठे जलस्त्रोत यामधून (Dam Water Level) धरणांमध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यामुळे राज्यभरातील धरणे आता ‘ओव्हरफ्लो’ च्या स्थितीमध्ये आहे. सोलापूरातील उजनी, गडचिरोलीतील मेडीगट्टा या धरणापाठोपाठ आता (Koyna Dam) कोयना धरणातील पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोयना नदीनमध्ये विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी (Heavy Rain) दमदार पाऊस झाल्याचा परिणाम आता पाहवयास मिळत आहे. चक्री दरवाजे उचलल्याने 18 हजार 780 क्यसेक तर पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.
105 टीएमसी क्षमतेचे कोयना धरण
कोयना धरणाची साठवण क्षमता ही 105 टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण पूर्णपणे भरुन अधिकचा धोका निर्माण होऊ नये म्हणून वाढती आवक पाहताच विसर्ग सुरु केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही धरणात 93.87 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच 87.19 टक्के धरण भरले असल्याने पु्न्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर कोयना नदीलगतच्या शेती क्षेत्रातही पाणी घुसेल असा अंदाज आहे.
यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय
कोयना धरणातून आतापर्यंत केवळ पायथा वीजगृहातून नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मध्यंतरीच्या पावसाने पुन्हा धरणात पाण्याची आवक ही वाढली. त्यामुळे आता धरणाचे 6 दरवाजे हे 3 फूट उचलून घेण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारपासून 18 हजार 780 क्युसेकने पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. धरणातील पाणीसाठा नियमनासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची अशीच आवक राहिली तर मात्र, पाण्याचा विसर्ग अधिक वाढणार आहे.
कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातील पाणीपातळीत वाढ झाल्याने आता कोयना नदीत तब्बल 20 हजार 880 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता कोयना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय खरीप हंगामातील पिकांनाही या वाढत्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाने उसंत घेतली आहे असली तरी वाढता पाण्याचा विसर्ग यामुळे धोकाही वाढत आहे.