महागाई नाही करणार घामाघूम, 25 रुपयांच्या तांदळाची असेल धूम
Bharat Brand Rice | नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य महागाईचा निर्देशांक गगनाला भिडला. किंमती 10.27% वर पोहचल्या. देशात अन्नधान्य महागाईचा निर्देशांक नोव्हेंबर महिन्यात 8.70 टक्के झाला. तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 6.61 टक्क्यांवर होता. ग्राहक निर्देशांकात महागाईचा वेलू गगनावर घेऊन जाण्यात फूड इन्फ्लेशन इंडेक्सने सर्वाधिक हातभार लावला.
![महागाई नाही करणार घामाघूम, 25 रुपयांच्या तांदळाची असेल धूम महागाई नाही करणार घामाघूम, 25 रुपयांच्या तांदळाची असेल धूम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Rice-Inflation-Modi-Government.jpg?w=1280)
नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात अन्नधान्याने केंद्र सरकारची झोप उडवली आहे. अन्नधान्य महागल्याने सर्वसामान्यांना मोठ फटका बसत आहे. पीठापासून ते डाळीपर्यंत सर्वच वस्तू महागल्या आहेत. तांदळाने त्यात अजून भर घातली आहे. देशात महागाई कमी करण्यासाठी भारत ब्रँड अंतर्गत केंद्र सरकार तांदळाची मोठी खेप बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या तांदळाची किंमत 25 रुपये किलो असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली आहे. महागाई दोन अंकी झाल्याने केंद्र सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
बाजारात स्वस्त तांदूळ
महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पीठपासून ते डाळीपर्यंत आणि कांद्यापासून ते टोमॅटोपर्यंत अनेक वस्तूंची विक्री स्वतः करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यात तांदळाची भर पडली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (Nafed) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि केंद्रीय भांडार यांच्या विक्री केंद्राची मदत त्यासाठी घेण्यात येणार आहे. सरकार भारत ब्रँड अंतर्गत यापूर्वीच पीठ आणि डाळींची विक्री करत आहे.
अन्नधान्य महागाईने केंद्र अडचणीत
नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किंमतीत 10.27% टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे देशात अन्नधान्याची महागाई नोव्हेंबर महिन्यात 8.70 टक्क्यांवर पोहचली. तर ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 6.61 टक्क्यांवर होता. अन्नधान्य महागाईने एकूणच ग्राहक किंमतीचा आकडा वाढला आहे. म्हणजे महागाई वाढली आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या मदतीने यापूर्वी केंद्र सरकारने गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणल्या होत्या. तर तांदळाच्या किंमती पण आटोक्यात ठेवल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीवर परिणाम नको
2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे वाढती महागाई केंद्र सरकारला अडचणीत आणू शकते. बाजारात अन्नधान्याचा पुरेसा साठा असावा यासाठी केंद्र सरकार आणि अन्न महामंडळ काम करत आहे. वाढत्या महागाईमुळे सध्या सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत. त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसू नये यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यामुळेच गव्हानंतर तांदळाची खुल्या बाजारात ग्राहकांसाठी विक्री करण्यात येत आहे.