आता मुकेश अंबानी याचं स्वस्त धान्य दुकान; Reliance चा मेगा प्लॅन, तुमचा काय फायदा होणार?
Mukesh Ambani Reliance Retail Shop : भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी येत्या काही दिवसात रिलायन्स रिटेलमध्येच रेशनची दुकान चालवू शकतात. देशातील सर्वात मोठे रिटेल नेटवर्कचे मालक मुकेश अंबानी यांची सरकारशी चर्चा सुरू आहे. रिलायन्स रिटेल शॉपमध्ये सरकारी उत्पादनं स्वस्तात खरेदीची संधी मिळू शकते.

मोठं शहर असो वा खेडेगाव, स्वस्त धान्य दुकान कोणत्या ना कोणत्या गल्लीत असतंच. याठिकाणी सरकारी योजनेत, सरकारच्या किंमतीत, अगदी स्वस्तात साखर, डाळी, गव्हाची आणि तांदळाची खरेदी करू शकता. आता हेच काम भारतातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी हे करतील. त्यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये ग्राहकांना स्वस्तात धान्य मिळेल. डाळी, तांदळासह इतर अनेक जीवनावश्यक वस्तू अत्यंत स्वस्तात खरेदी करता येतील. मुकेश अंबानी सध्या देशातील रिटेल किंग ठरले आहे. स्मार्ट बाजारापासून ते जिओ स्टोअर, जिओ मार्ट सह फॅशनेबल कपडे, खेळणी, ज्वेलरी या क्षेत्रात पण रिलायन्सने जबरदस्त पकड मिळवली आहे. पण रिलायन्स रिटेलमध्ये या वस्तू मिळण्याची सोय होणार तरी कशी?
महागाई कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन
केंद्र सरकार वाढती महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल नेटवर्कचा वापर करण्यात येणार आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकार या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा विचार करत आहे. रिलायन्स रिटेल आणि भारत सरकार यांच्यात याविषयीच्या चर्चेची पहिली फेरी झाल्याचे समोर येत आहे. ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार रिलायन्स रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून स्वस्त दरात भारत ब्रँडचे पीठ, डाळी, तांदळासह इतर वस्तूंचा पुरवठा करण्याचा विचार करू शकते. प्रत्येक वर्गाला महागाईचे चटके बसत आहेत. या वर्गाला दिलासा देण्यासाठी आणि महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकार रिलायन्ससोबत मिळून स्वस्तात धान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा करू शकते.




काय आहे भारत ब्रँड?
गेल्या काही वर्षात पीठ, डाळी, गव्हाचे आणि तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या किंमती अचानक वधारल्याने केंद्र सरकारने भारत ब्रँड लाँच केला. यामध्ये स्वस्त किंमतीत पीठ, डाळी आणि तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. या ब्रँडची सुरूवात केंद्र सरकारने 2023 मध्ये केली होती. सध्या सरकार नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून या ब्रँडची विक्री करते. या ब्रँड अंतर्गत ग्राहकांना 29 रुपये प्रति किलोने तांदळाचा पुरवठा, तर प्रति किलो 27.50 रुपये दराने पीठ, तूर डाळ 60 रुपये किलो दराने विकल्या जाते.