पहिलीच्या प्रेमसंबंधात वाद, दुसरी घरगुती वादाला कंटाळली, तिसरीची तर भलतीच गोष्ट
इंदूरमधील राजेंद्र नगरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिन्ही मुळच्या सिहोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिन्ही मुलींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले.

आजच्या जमान्यात तरुण मुले अत्यंत कमजोर मनाची झाली आहेत. किरकोळ कारणावरून वाद करणे तसेच छोट्या छोट्या कारणांवरून आयुष्य संपवणे, असे टोकाचे निर्णय तरुण मुले घेत आहेत. मध्य प्रदेशातील तीन अल्पवयीन मुलींनी देखील किरकोळ कारणांवरून स्वतःचे जीवन संपवण्याचा घातक प्रयत्न केला. तिघींनी एकाच वेळी विषप्राशन केले. तिघींपैकी दोघींचा मृत्यू झाला असून तिसरीची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलींनी ज्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले ते धक्कादायक आहे.
काय आहे प्रकरण?
एकीने प्रेमसंबंधातील वादातून जीवन संपवले, तर दुसरी मुलगी घरगुती वादाला कंटाळली होती. तिसऱ्या मुलीचे कारण तर आणखी धक्कादायक आहे. आपल्या दोन मैत्रिणींच्या आयुष्यातील असलेल्या समस्यांच्या चिंतेतून तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
तिघींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले
इंदूरमधील राजेंद्र नगरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिन्ही मुळच्या सिहोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिन्ही मुलींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत घटनेचा तपास सुरु केला.



उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू, एकीची प्रकृती स्थिर
गंभीर अवस्थेत उपचार सुरु असताना दोघींचा मृत्यू झाला, तर तिसरीची प्रकृती आता स्थिर आहे. तिसऱ्या मैत्रिणीची विचारपूस केली असता सदर बाब उघडकीस आली. मुलींच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
घटना घडली तेव्हा तिघी मैत्रिणी राजेंद्र नगरमधील रीजनल पार्कमध्ये फिरत होत्या. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.