Bhool Bhulaiyaa 2: IPL फिनालेदरम्यानही ‘भुल भुलैय्या 2’ची जबरदस्त कमाई; 10 दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटासोबत कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ‘भुल भुलैय्या 2’पुढे कंगनाचा चित्रपट टिकू शकला नाही. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीतही ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे.

Bhool Bhulaiyaa 2: IPL फिनालेदरम्यानही भुल भुलैय्या 2ची जबरदस्त कमाई; 10 दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
Bhool Bhulaiyaa 2
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 12:52 PM

अनीस बाजमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी बक्कळ कमाई केली आहे. गेल्या दहा दिवसांत या हॉरर-कॉमेडीने तब्बल 122.69 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि तब्बू यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ‘भुल भुलैय्या 2’ने प्रदर्शनाच्या दिवशीच 14.11 कोटी रुपये कमावले होते. तेव्हापासून दररोज या चित्रपटाची कमाई 10 ते 12 कोटी रुपयांमध्ये होतेय. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. प्रियदर्शनने अक्षय कुमार आणि विद्या बालनचा पहिला भाग दिग्दर्शित केला होता. अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन सीक्वेलमध्ये घेऊ शकेल का, असा प्रश्न प्रदर्शनापूर्वी अनेकांना पडला होता. मात्र कार्तिक आर्यनने आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

दुसऱ्या वीकेंडची कमाई-

शुक्रवार- 6.52 कोटी रुपये
शनिवार- 11.35 कोटी रुपये
रविवार- 12.77 कोटी रुपये
एकूण- 122.69 कोटी रुपये

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

कार्तिक आर्यनच्या या चित्रपटासोबत कंगना रनौतचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र ‘भुल भुलैय्या 2’पुढे कंगनाचा चित्रपट टिकू शकला नाही. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीतही ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. या यादीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ पहिल्या क्रमांकावर आहे. तर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मागे टाकलं आहे.

चित्रपटाची कथा-

रुहान रंधावा (कार्तिक आर्यन) आणि रीत ठाकूर (कियारा अडवाणी) हे दोघं एका हिल स्टेशनवर एकमेकांना भेटतात. रुहान आणि रीत एका पडक्या हवेलीत थांबतात जिथे मंजुलिकाचा आत्मा 18 वर्षांपासून बंदिवासात असल्याचं मानलं जातं. चित्रपटातील घडामोडींदरम्यान रुहान हा रूह बाबा बनतो आणि तो भूतांशी, मृत लोकांच्या आत्म्यांशी बोलू शकतो असा दावा करू लागतो. अनेक वर्षांपासून हवेलीत बंदिस्त असलेला आत्मा जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा काय होतं, मंजुलिका तिचा सूड घेणार का, रुह बाबा तिला हाताळू शकेल का, हे सर्व प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल.