Chhaava : गैरों में कहां दम था… औरंगजेबाआधी हे 4 जण होते छत्रपती संभाजी महाराजांच्या वाईटावर
Chhaava : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने 150 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. औरंगजेबाने किती निदर्यतेने छत्रपती संभाजी महाराजांना संपवलं ते सुद्धा या चित्रपटात दाखवलय. पण औरंगजेबाच्याआधी काही जवळची माणसं छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात होती. त्यांच्या वाईटावर होती. कोण होते हे लोक? त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

मुगल बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत अत्यंत क्रूरता दाखवली. औरंगजेबाने जी निदर्यता दाखवली, जो छळ केला, ते ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर पाहिल्यानंतर आजही लोकांच रक्त खवळतं. सध्या गाजत असलेल्या विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना छळून, यातना देऊन मारलं. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच माणसांनी दगा दिला नसता, तर ते कधी औरंगजेबाच्या कैदेत सापडले नसते, ना त्यांचा असा मृत्यू झाला असता. हे फार कमी जणांना माहित असलेलं सत्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच जवळच्या चार माणसांनी दगा दिलेला.
गणोजी शिर्के
गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. ते छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंचे बंधू होते. त्यांनी ‘वतनदारी’च्या मुद्दावरुन छत्रपती संभाजी महाराजांना दगा दिलेला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं ऐकलं नाही, तेव्हा गणोजी शिर्के थेट मुगलांना जाऊन मिळाले. त्यांनी संभाजी महाराजांची रणनिती मुकर्रब खानाला सांगितली. त्यांच्या याच दगाबाजीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना मुगलांनी कैद केलं. ‘छावा’ चित्रपटात गणोजी शिर्केची भूमिका सारंग साठेने साकारली आहे.
कान्होजी शिर्के
कान्होजी शिर्के सुद्धा गणोजी शिर्के यांच्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईचे बंधु होते. त्यांनाही स्वराज्यापेक्षा वतनदारीवर जास्त प्रेम होतं. शिर्के कोकणच्या श्रृंगारपुरमधील दाभोळ क्षेत्रात रहायचे. महाराजांनी त्यांना तिथलं उत्तराधिकारी म्हणून घोषित करावं, अशी त्यांची इच्छा होती. जेणेकरुन पूर्ण जमीन त्यांच्या ताब्यात येईल. पण ‘स्वराज्या’ची संकल्पना मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना ‘वतनदारीची’ ही पद्धत मान्य नव्हती. त्यांनी पुढे छत्रपती संभाजी महाराजांना ‘वतनदारी’साठी राजी करण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला, तेव्हा कान्होजी शिर्के यांनी सुद्धा भावासोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कारस्थान रचलं. स्वराज्यासोबत गद्दारी केली. सुव्रत जोशीने कान्होजीची भूमिका साकारली आहे.
अनाजी पंत
अनाजी पंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख सचिव होते. त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कधीच जमलच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज छत्रपती बनू नये, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांचा हेतू कधी यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात इतका राग होता की, त्यांनी स्वराज्याशी गद्दारी करत अकबराला पत्र लिहिलेलं. आपल्याशी हातमिळवणी करुन छत्रपती संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा प्रस्ताव दिलेला. छत्रपती संभाजी महाराजांना या दगाबाजीबद्दल समजल्यानंतर त्यावेळी त्यांनी अनाजी पंतांना कठोर शासन केलं. किरण करमरकरने विकी कौशलच्या ‘छावा’ मध्ये अनाजी पंतची भूमिका साकारली आहे.
सोयराबाई
सोयराबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. संभाजी महाराजांऐवजी पोटचा मुलगा राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या गादीवर बसावा अशी त्यांची इच्छा होती. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या अनाजी पंतबरोबर हातमिळवणी केली. पण त्यांचे इरादे यशस्वी होऊ शकले नाहीत. संभाजी महाराजांना जेव्हा, त्यांच्या कृत्यांबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवलं. पुढे प्रकृती बिघडल्यामुळे सोयराबाईंचा मृत्यू झाला. दिव्या दत्ताने सोयराबाईची भूमिका साकारली आहे.