पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता इमरान हाश्मीने प्रतिक्रिया दिली आहे. बैसरन पठारावर सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे होती, असं त्याने म्हटलंय. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, असंही तो म्हणाला.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. या हल्ल्यावर सर्वच स्तरांतून तीव्र संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. पहलगाम हल्ल्यावर आता अभिनेता इमरान हाश्मीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीविषयीही भाष्य केलं. पहलगाम हल्ल्याच्या ठीक दोन दिवस आधी म्हणजेच 20 एप्रिलपासून बैसरनचं पठार सुरक्षा यंत्रणेच्या परवानगीविना पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे याची माहिती पहलगामच्या स्थानिक प्रशासनालाही नव्हती. तिथल्या स्थानिक पर्यटन कंपन्यांनी पर्यटकांना बैसरन पठारावर घेऊन जाणं सुरू केलं. पण त्याची माहिती सुरक्षा व्यवस्थांना नव्हती. त्यामुळे बैसरन भागात निमलष्कराची किंवा पोलिसांची सुरक्षा तैनात केली गेली नाही, अशी माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली होती.
इमरान म्हणाला, “अर्थातच आपल्या सुरक्षा यंत्रणांना आणि ज्यांना या गोष्टींबद्दलची समज असते त्यांना घटनेविषयीची सविस्तर माहिती मिळाली असेल. अर्थातच आपली इंटेलिजन्स खूप चांगली आहे. पण तिथेही प्रश्न उपस्थित होत आहे की त्याठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात असायला पाहिजे होती. परंतु बैसरन पठार हे खूप मोठं आहे. त्यामुळे त्याठिकाणी तुम्ही आपल्या किती अधिकाऱ्यांना तैनात करणार? पण ते पर्यटकांसाठी हॉटस्पॉट होतं. दहशतवाद्यांनी पद्धतशीरपणे हा हल्ला केला. कारण पर्यटनासाठी ते खूप महत्त्वाचं आणि लोकप्रिय ठिकाण होतं. तिथे जवळपास रस्ते नाहीत. हल्ला करून ते पसार झाले. दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला होता.”
या दहशतवादी हल्ल्याचा वापर कोणत्याही धर्माविषयी नकारात्मकता पसरवण्यासाठी करू नये, असं मत इमरानने मांडलंय. याविषयी तो पुढे म्हणाला, “दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. ते विकृत विचारसरणीचे असतात. आपल्या धर्मात अशी शिकवण कधीच दिली जात नाही. या कठीण काळात एक देश म्हणून आपण सर्वांनी सोबत राहिलं पाहिजे”, असं आवाहन त्याने केलंय.




इमरान हाश्मीचा ‘ग्राऊंड झिरो’ हा काश्मीरच्या दहशतवादावर आधारित चित्रपट पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत पाच कोटी रुपयांची कमाई केली आहे.