रिव्ह्यू: भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध
Bhaai – Vyakti Ki Valli Movie review भाई व्यक्ती की वल्ली पूर्वाधाने रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला.पूर्वार्धात भाईंचं बालपण; लग्न आणि सुरुवातीच्या काळातील रंजक गोष्टी हलक्या फुलक्या पध्दतीनं दाखवण्यात आल्या. कुमार गंधर्व; भीमसेन जोशी; वसंत देशपांडे स्वत: पुलं यांच्या तृप्त करणाऱ्या मैफिलीनं पूर्वाधाचा शेवट झाला होता. पूर्वार्ध संपतो तिथूनच खऱ्या अर्थानं उत्तरार्ध सुरु होतो. चित्रपटाचा […]

Bhaai – Vyakti Ki Valli Movie review भाई व्यक्ती की वल्ली पूर्वाधाने रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला.पूर्वार्धात भाईंचं बालपण; लग्न आणि सुरुवातीच्या काळातील रंजक गोष्टी हलक्या फुलक्या पध्दतीनं दाखवण्यात आल्या. कुमार गंधर्व; भीमसेन जोशी; वसंत देशपांडे स्वत: पुलं यांच्या तृप्त करणाऱ्या मैफिलीनं पूर्वाधाचा शेवट झाला होता. पूर्वार्ध संपतो तिथूनच खऱ्या अर्थानं उत्तरार्ध सुरु होतो. चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्वाधापेक्षा जास्त आनंद देणारा आहे असं मला वाटतं. कारण भाईंच्या आयुष्यात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा अचूक वेध उत्तरार्धात घेण्यात आला आहे. पुलंचं आयुष्य 2.30 तासात पडद्यावर साकारणं अशक्य. त्यामुळेच तर दोन भागात हा चित्रपट आणण्याचं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठरवलं. हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं आहे.
भाईंची नेहरुंसोबतची भेट; दूरदर्शनमधील नोकरीचा राजीनामा देणे; मराठी रंगभूमीशी जोडलेली नाळ; बाबा आमटेंसोबतचा स्नेह; आनंदवनमध्ये जाऊन केलेला कार्यक्रम; महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारतांना व्यासपीठावरुनचं शिवसेनेवर ‘ठोकशाही’ म्हणत केलेली टीका; नंतर बाळासाहेबांनी केलेल्या टीकेला हलक्याफुलक्या पध्दतीनं घेणं; आणीबाणीचा काळ या सगळ्या प्रसंगातून पुलंच्या आयुष्यातील अनेक पैलू चित्रपटात उलगडण्यात आले आहेत. या सगळ्या प्रवासात सुनिता ताईंनी त्यांना खंबीरपणे दिलेली साथही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उत्तम पध्दतीनं दर्शवली आहे. गणेश मतकरींची पटकथा आणि रत्नाकर मतकरींचे संवाद यांनी उत्तरार्ध कमालिचा रंगवला आहे.
भाईंच्या चरित्रपटात तब्बल 70 कलाकारांनी काम केलं आहे. नेहरुंच्या भूमिकेतील दिलीप ताहिल; बारक्याच्या भूमिकेतील गिरीश कुलकर्णी; विजया बाईंच्या भूमिकेतील मधुरा वेलणकर आणि नीना कुलकर्णी; बाबा आमटेंच्या भूमिकेतील संजय खापरे; विजय तेंडुलकरांच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड; बेरक्या राजकारण्याच्या भूमिकेतील भारत गणेशपुरे सगळ्यांनी छोट्या भूमिकांमध्ये अफलातून कामं केली आहेत. त्यामुळेच भाईंच्या आयुष्यातील दुसरा अंक अजून रंजक झाला आहे. विशेषत: गिरीश कुलकर्णीनं बारक्याच्या भूमिकेत धमाल आणली आहे.
भाईंच्या भूमिकेत सागर देशमुख आणि सुनिता ताईंच्या भूमिकेत इरावती हर्षेने उत्तरार्धातही कमाल काम केलं आहे. तर वृध्दापकाळातील भाई विजय केंकरे आणि सुनिता ताई शुभांगी दामलेंनी उत्तम रंगवले आहेत.
पूर्वाधाप्रमाणेच उत्तरार्धातही सुंदर तृप्त करणारी 12 मिनिटांची मैफिल रंगवण्यात आली आहे. सोबतीला ‘नाच रे मोरा’ गाणंही आहेच. संगीतकार अजित परबनं चित्रपटाच्या संगीतावर घेतलेली मेहनत यातून दिसते.
एकूणचं काय तर पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध तुम्हाला जास्त आनंद देतो. लाडक्या भाईंचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर बघणं पर्वणी आहे. त्यामुळेच हा अनुभव थिएटरला जाऊन घ्यायलाच हवा. कारण व्यक्तींच्या आड दडलेला ‘वल्ली’ भाई पुन्हा होणे नाही.
टीव्ही नाईन मराठी कडून या चित्रपटाला मिळत आहेत साडे तीन स्टार