“मी आतून संपले..”; सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितला घटस्फोटादरम्यान कोर्टातील ‘तो’ अनुभव
अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटाच्या वेळी कोर्टात असताना तिच्या मनात काय भावना होती, याविषयी तिने सांगितलं.

अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या तब्बल 24 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2022 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. अनेक उदाहरणांमध्ये घटस्फोटाचा भावनिक परिणाम फार काळापर्यंत राहतो. असाच काहीसा अनुभव सीमाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. या मुलाखतीत तिच्यासोबत अभिनेता इमरान खानची पूर्व पत्नी अवंतिका मलिकसुद्धा होती. या दोघींच्या घटस्फोटाला काही वर्षे झाली असली तरी कायदेशीर प्रक्रियांच्या मानसिक धक्क्यातून त्या अजूनही सावरल्या नाहीत. एकीकडे जोडीदार आणि कुटुंबीयांपासून दूर होण्याच्या वेदना असतानाच घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या अनुभवामुळे तुम्ही आणखी खचता, असं त्यांनी म्हटलंय.
याबद्दल सीमा म्हणाली, “ज्याप्रकारे ते तुमचं नाव मोठ्याने ओरडून बोलवतात, तेव्हा रेल्वे स्टेशनवर असल्यासारखं वाटतं. ते मोठमोठ्याने तुमचं नाव वाचतात आणि लोक तुमच्याकडे बघत बसतात. त्यावेळी तुम्हाला खूप लहान असल्यासारखं, तुमचं काहीच महत्त्व नसल्यासारखं आणि तुमची काहीच गरज नसल्यासारखं वाटतं. मला अजूनही आठवतंय, हे सर्व फक्त इतक्यासाठीच होतं का? या सगळ्या गोष्टींचा अंत हात आहे का? असे प्रश्न मला पडले होते. जेव्हा न्यायाधीशांनी म्हटलं की, ‘घटस्फोट झाला’, तेव्हा मी आतून संपले होते.”




View this post on Instagram
याच मुलाखतीत अवंतिकानेही तिचा कोर्टातील अनुभव सांगितला. “शेवटच्या वेळी जेव्हा मी कोर्टात गेले, तेव्हा मी माझ्या वकिलांना सांगितलं की, जेव्हा कधी माझ्या मनात असा विचार आला की, अरे चला पुन्हा लग्न करुयात, तेव्हा मला फॅमिली कोर्टातील हा क्षण आठवण्याची खूप गरज असेल”, असं ती म्हणाली.
सीमा ही फॅशन डिझायनर असून तिने 1998 मध्ये सोहैल खानशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे सोहैलशी लग्न करण्यासाठी तिने बिझनेसमन विक्रम अहुजाशी साखरपुडा मोडला होता. सोहैल आणि सीमाला निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. आता घटस्फोटानंतर सीमा आणि विक्रम एकमेकांना डेट करत आहेत. खुद्द सीमानेच याची कबुली दिली होती. विक्रम बॉयफ्रेंड म्हणून माझ्या आयुष्यात परत आलाय, असं तिने सांगितलं.
“आयुष्य खूप छोटं आहे. ते मनसोक्त जगा आणि आनंदी राहा. हास्य हे सर्वोत्कृष्ट औषध आहे आणि ज्यादिवशी तुम्ही एकत्र हसणं थांबवता, तेव्हा सर्व गोष्टी संपतात. तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचायला हवं जेव्हा तुम्ही परत तुमच्या जोडीदारावर प्रेम करू शकाल. तुम्ही त्याचा द्वेष करू नका. लग्नात तुम्ही इतके आत्मसंतुष्ट असता. त्यावेळी जर तुम्ही विचारलं असता, तर कदाचित मी सोहैलवर सगळा दोष दिला असता”, अशी प्रतिक्रिया सीमाने तिच्या घटस्फोटाबद्दल दिली.