TMKOC: दयाबेनच्या भूमिकेत दिशा कधीच परतणार नाही? निर्मात्यांनी सांगितलं कारण

तारक मेहता.. या मालिकेनं नुकतंच 15 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. जवळपास 3300 एपिसोड्स या मालिकेने पूर्ण केले आहेत. नुकतीच या मालिकेत सचिन श्रॉफची एण्ट्री झाली.

TMKOC: दयाबेनच्या भूमिकेत दिशा कधीच परतणार नाही? निर्मात्यांनी सांगितलं कारण
Disha Vakani
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 3:36 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. छोट्या पडद्यावरील ही सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यातील जेठालाल, बबिता, दयाबेन, टप्पू, तारक मेहता या भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. या मालिकेत जेठालालची पत्नी दयाबेनची (Dayaben) भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारली. 2008 ते 2017 पर्यंत दिशा या मालिकेत काम करत होती. मात्र बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि पुन्हा ती परतलीच नाही.

मालिकेत दयाबेन कधी परतणार असा प्रश्न वारंवार चाहत्यांकडून उपस्थित केला गेला. दिशा पुन्हा मालिकेत यायला तयार नसल्याने नवीन अभिनेत्रीच्या शोधात असल्याचं निर्मात्यांनी याआधी स्पष्ट केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते पुन्हा एकदा दयाबेनच्या भूमिकेबाबत व्यक्त झाले आहेत.

“दया भाभी ही एक अशी व्यक्तीरेखा आहे, जिला प्रेक्षक सहजासहजी विसरू शकणार नाही. दयाबेनची गैरहजेरी प्रेक्षकांना सातत्याने जाणवतेय. कोविडच्या काळात आम्ही दिशाच्या परत येण्याची वाट पाहिली. आजही मी तिच्या उत्तराची वाट पाहतोय. तिने मालिकेत परत यावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतोय”, असं ते पिंकविला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

दिशाच्या परतण्याविषयी ते पुढे म्हणाले, “तिचं एक कुटुंब असून त्याच्याशी निगडीत जबाबदाऱ्यांमध्ये ती अडकली आहे. प्रेक्षकांप्रमाणे मीसुद्धा तिची वाट पाहतोय. तुम्ही दिशाच्या बाजूनेही विचार करून पहा. तिलासुद्धा भूमिका साकारण्याची भूक आहे पण लग्नानंतर तिच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. आता ती आई झाल्याने त्यातून वेळ काढू शकत नाहीये.”

तारक मेहता.. या मालिकेनं नुकतंच 15 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. जवळपास 3300 एपिसोड्स या मालिकेने पूर्ण केले आहेत. नुकतीच या मालिकेत सचिन श्रॉफची एण्ट्री झाली. शैलेश लोढाची जागा मालिकेत सचिनने घेतली आहे. आता टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकतसुद्धा मालिकेचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.