कॅन्सरचा धोका ! मंचुरियन नंतर आता पाणीपुरीवर ही येणार बंदी
रस्त्यावर विविध ठिकाणी विविध खाद्यपदार्थाच्या राड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. लोकं स्ट्रीट फूड खाण्यासाठी मोठी गर्दी करतात. पण आरोग्याच्या दृष्टीने ते खूपच धोकादायक असू शकतं. त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.
![कॅन्सरचा धोका ! मंचुरियन नंतर आता पाणीपुरीवर ही येणार बंदी कॅन्सरचा धोका ! मंचुरियन नंतर आता पाणीपुरीवर ही येणार बंदी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/pani-puri-1.jpg?w=1280)
स्ट्रीट फूडची क्रेज लोकांमध्ये प्रचंड आहे. रस्त्यावरील पाणी-पुरी स्टॉल पाहून प्रत्येकाचे मन त्याच्याकडे जाते. बहुतांश शहरांमध्ये लोकप्रिय असलेले स्ट्रीट फूड पाणी-पुरी, कर्नाटकमध्ये मात्र बॅन होण्याच्या मार्गावर आहे. तपासादरम्यान सरकारला पाणीपुरीमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण करणारे रासायनिक रंग आढळले आहेत. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. गरज पडली तर सरकार पाणीपुरीवरही बंदी देखील घालू शकते. यापूर्वी सरकारने मंचुरियन आणि कबाबमधील कृत्रिम रंगांवर बंदी घातली होती.
पाणीपुरीवर येणार बंदी?
कर्नाटकच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील दुकानांमधून सुमारे 250 पाणीपुरीचे नमुने गोळा करण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की एकूण नमुन्यांपैकी 40 नमुने अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. यामध्ये ब्रिलियंट ब्लू, टारट्राझिन आणि सनसेट यलो यांसारखे कर्करोग निर्माण करणारे रासायनिक रंग आढळून आले आहेत. ही अशी रसायने आहेत, ज्यांच्या नियमित सेवनाने शरीराच्या अवयवांना मोठी हानी होऊ शकते. कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.
आता ही गोष्ट समोर आल्यानंतर आरोग्य विभाग योग्य ती कारवाई करेल, असे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एक पाऊल पुढे टाकत दिनेश गुंडू राव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता राखणे, स्वयंपाक करताना काळजी घेणे आणि रासायनिक रंग न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यात आरोग्य मंत्री राव म्हणाले की, “कॉटन कँडी, गोबी आणि कबाबच्या निर्मितीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी असल्याने, राज्यात विकल्या जाणाऱ्या गोलगप्पाचे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अनेक नमुने चाचणीत नापास झाले आहेत. ” याबाबत अधिक विश्लेषण सुरू असून, अहवाल आल्यानंतर आरोग्य विभाग योग्य ती कारवाई करेल, असे ते म्हणाले. तसेच जनतेने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.