Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…
मसाल्याच्या सर्वच घटकांमध्ये साधारणत: 25 ते 30 टक्के दरवाढ झालेली आहे. खसखसवरील आयात बंदी आता उठवल्यामुळे पुढील काळात तीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. एकंदर इंधन, एलपीजी आदींच्या दरवाढीनंतर आता मसाल्यांच्या दरात झालेली वाढ कंबरडं मोडणारी आहे.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये (indian Food culture) मसाल्यांना (spices) अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. अगदी पुरातण काळापासून भारतात मसाल्यांचा वापर केला जात असतो. अनेक जण विकतचे मसाले आणण्याऐवजी घरीच कच्चे मसाले आणून आपल्या पध्दतीने त्यांना कुटून, वाळवून व नंतर दळून त्यांची साठवणूक करीत असतात. साधारणत: उन्हाळा लागताच मसाले तयार करण्याची प्रक्रिया सुरु होत असते. पंरतु गेल्या काही महिन्यांचा विचार करता मसाल्यांच्या दरात मोठी वाढ (price increase) झालेली आहे. लालबाग मिरची मार्केटमधील ‘इंदुलकर मसाले’चे नीलेश सावला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ऐन पीक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीसह अन्य मसाल्यांच्या पिकांची मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक पीक खराब झाल्याने यंदा मसाल्यांचे भाव पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे.
खसखस का महागली ?
भारतात तुर्कीतून मोठ्या प्रमाणाम खसखसची आवक होत असते. परंतु आयातीच्या धोरणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून खसखसच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. परिणामी देशांतर्गत उत्पादीत होत असलेलीच खसखस बाजारात उपलब्ध होत होती. त्यामुळे मागणी जास्त व तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने खसखसचे भाव गगणाला भिडले आहेत. आता सध्या खसखसच्या आयातीवरील बंदी उठवली असून बाहेरुन आयातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील उत्पादनानंतर खसखसचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा फटका
गेल्या वर्षी नाव्हेंबर, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ऐन मसाले पीक काढण्याच्या तयारीत असताना पावसाने घोळ केला. काढणीवर आलेली मिरची पावसाने खराब झाली. मिरचीच्या आतील भाग पाण्यामुळे काळवंडला आहे. अनेकांना हे पीक फेकून देण्याचीही वेळ आली. मिरचीसह अन्य मसाला पिकांचीही तीच गत झाली. त्यामुळे मालाचा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीसह अन्य मसाल्यांचा तुटवडा निर्माण होउन मसाल्याचे दर वाढले आहे.
प्रमुख मसाल्यांचे दर
मसाले आधीचे दर / आताचे दर / (किलोत)
काश्मीरी मिरची : 400 ते 500 : 600 ते 700
तिखट मिरची : 200 : 400
मालवणी मसाला : 500 : 800
मिरची पावडर : 500 : 700
धने : 550 : 750
खसखस : 1200 : 1800
लवंग : 800 : 1000 ते 1600
जिरे : 300 : 400
मोहरी : 200 : 260 ते 350
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मसाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मसाल्यांमध्ये आता झालेली दरवाढ हा त्याचाच परिपाक आहे. नवीन पीक येइपर्यंत दरवाढ कमी होण्याची कुठलीही लक्षणे सध्या दिसत नाहीत.
– नीलेश सावला, इंदुलकर मसाले, लालबाग-परळ.