…तेव्हाच निर्णय होईल, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आज विधान परिषदेत सभागृहात कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वाची माहिती दिली.

विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गदारोळ झाला. दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी हा गदारोळ सुरु झाला. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे विधान परिषदेत आक्रमक झाले होते. कोर्टाने माणिकराव कोकाटेंना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. “देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारण केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. तथापी माननीय विरोधी पक्ष नेत्याला एवढच सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
काय शिक्षा सुनावलीय?
1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर होता. या प्रकरण कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनवाली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.