Sanjay Raut : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच नाव आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Sanjay Raut : "याचिकेत काय आहे हे मला माहित नाही. पण याचिकेसाठी जी वेळ निवडलेली आहे. महाराष्ट्रात औरंगजेबावरुन वातावरण तापलेलं आहे. अशावेळी याचिका येते. याचिकाकर्त्याच्या मागे कुठलीतरी शक्ती काम करतेय. त्यांच्यामागे सर्व शक्ती आहेत. त्या याचिकेभोवती औरंगजेबाच प्रकरण बाजूला सारून चर्चा घडवली जाते. यामागे जे लोक आहेत, त्यांची नाव सांगण्याची गरज नाही" असं संजय राऊत म्हणाले.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलले आहेत. “या देशात महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरण घडत असतात कुटुंबीय, आई-वडिल हे न्यायासाठी समोर येतात. न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. पोलीस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा आहे. पाच वर्षानंतर त्याचं म्हणणं आहे की, आमच्यावर दबाव होता. यावर कसा विश्वास ठेवणार तुम्ही” असं संजय राऊत म्हणाले.
“ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्याने जो प्रयत्न सुरु आहे, या माध्यमातून स्पष्ट दिसतय, औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं आहे. औरंगजेबाला कबूरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला. पण औरंगजेब त्यांच्यावरच उलटला. म्हणून औरंगजेबापासून मुक्ततता मिळवण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून हे प्रकरण शिजतय” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘कबरी तुम्ही ज्या खोदत आहात, त्यात तुम्हाला जावं लागेल’
“यामागे कोणाची प्ररेणा आहे? कोणाची शक्ती आहे? कोण पडद्यामागे हालचाली करत होतं, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल, तर ते राजकारण तुम्हाला लखलाभ ठरो” असं संजय राऊत म्हणाले. “औरंगजेबाला साडेतीनशे-चारशे वर्षांनी कबरीतून तुम्ही बाहरे काढल्यानंतर अशा अनेक कबरी तुम्ही ज्या खोदत आहात, त्यात तुम्हाला जावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले. “एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले. त्यातून काही निष्पन्न झालं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘मग जस्टिस लोहिया, सोहराबुद्दीन यांची कबर उकरावी लागेल’
“भाजपच राज्य आल्यापासून भाजपात काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून ते जे अस्वस्थ आहेत, त्यांच्या हाताला काही लागत नाहीय. प्रतिष्ठा मिळत नाहीय. त्यातून अस्वस्थतता आहे” असं संजय राऊत म्हणाले. “शिवसेना इतके हल्ले पचवून, आक्रमकपणे पुढे चालली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्याने उभा राहिला आहे. ही एक पोटदुखी आहे, भिती आहे. मग अशा कबरी उकरायच्या म्हटल्या, तर जस्टिस लोहिया, सोहराबुद्दीन यांची कबर उकरावी लागेल तसच महाराष्ट्रात कोकणात रमेश गोवेकरांपासून अंकुश राणे, सत्याविजय भिसेंपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अशी शेकडो थडगी आणि त्यांचा तपास नव्याने करावा लागेल” असं संजय राऊत म्हणाले.