Vadhvan Port : वाढवण बंदरामुळे आर्थिक चित्र कसं बदलणार मोदींनी सांगितलं
Vadhvan Port : "60 वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला. काही लोक सुरुच करत नव्हते. 2014 मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत पाठवलं. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. 2020 मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले आहेत. पालघर जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झालं, तसच अनेक विकासकामांचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. पण या बंदरामुळे इथलं आर्थिक चित्र कसं बदलणार? ते पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. “या पोर्टवर हजारो जहाज येतील. कंटेनर येतील. या संपूर्ण परिसराची आर्थिक चित्र बदलणार आहे. रेल्वे आणि हायवे कनेक्टिव्हीटीशी आम्ही बंदराला जोडू. या पोर्टवरून नवीन व्यापार सुरू होणार आहे. या बंदराची लोकेशन म्हणजे सोने पे सुहागा” असं पीएम मोदी म्हणाले.
“सर्व काही या ठिकाणी जवळ आहे. दिल्लीचा महामार्ग जवळ आहे. वर्षभर इथून कार्गो येईल आणि जाईल. त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. राज्यातील बहीण भावांना मिळेल. नव्या पिढीला मिळेल. महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेकिंग इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज आत्मनिर्भर अभियानाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज भारताच्या प्रगतीत महाराष्ट्र मोठी भूमिका निभावत आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
’60 वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला’
“दुर्भाग्य आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्षाने तुमच्या विकासावर, तुमच्या भल्यावर नेहमी ब्रेक लावण्याचं काम केलं. मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती. पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे. हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो. पण 60 वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला. काही लोक सुरुच करत नव्हते. 2014 मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत पाठवलं. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. 2020 मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकार बदललं. त्यानंतर अडीच वर्ष या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही” अशी टीका मोदींनी महाविकास आघाडीवर केली.
किती लाख रोजगार निर्माण होणार?
“एकट्या या प्रकल्पाने या ठिकाणी अनेक लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे. 12 लाख रोजगार येणार आहे. या विकासाला कुणाचा विरोध होता. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते. राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता. आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेलं? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरं तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचं आहे. पण आमच्या महायुती सरकार राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचं आहे” असं पीएम मोदी म्हणाले.