नवाब मलिक अजित दादांच्या बैठकीत, फडणवीसांच्या विरोधाचं काय?
जेलमधून जामिनावर सुटल्यापासून नवाब मलिकांनी आपण नेमकं कोणासोबत हे स्प्ष्ट केलेलं नाही. मात्र पुन्हा एकदा मलिक अजित पवारांच्या बैठकीत हजर झाले. त्यामुळं फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवार मलिकांसोबत घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
![नवाब मलिक अजित दादांच्या बैठकीत, फडणवीसांच्या विरोधाचं काय? नवाब मलिक अजित दादांच्या बैठकीत, फडणवीसांच्या विरोधाचं काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/nawab-malik-vs-fadnavis.jpg?w=1280)
अजित पवारांच्या बैठकीत, नवाब मलिकांनी हजेरी लावली आणि पुन्हा मलिक अजित पवारांच्याच राष्ट्रवादीसोबत आहेत का ?, अशी चर्चा सुरु झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवारांनी बैठक घेतली. त्या बैठकीला मलिकही उपस्थित होते. आता मलिकांवरुन भुवया उंचावण्याचं कारण म्हणजे भाजप, विशेषत: फडणवीसांचा विरोध…फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत घेण्यास विरोध असल्याचं म्हटलं होतं मात्र कालच्या बैठकीनंतर दादांनी विधान भवनात येताना 3 शब्दांची प्रतिक्रिया दिली.
तुम्हाला त्रास होतोय का ?…अजित पवारांच्या या प्रतिक्रियेवरुन हे स्पष्ट झालं की मलिक अजित पवारांसोबत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मिटकरींनीही नवाब मलिक आमच्याच सोबत असल्याचं म्हटलंय. मात्र भाजपकडून मंत्री मुनगंटीवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की, मलिकांना महायुतीचा भाग करण्यास विरोधच आहे. भाजपच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात, फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते. ज्यानंतर ईडीचीही कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसून मलिकांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं. त्यानंतर तात्काळ फडणवीसांनी पत्र लिहून मलिकांना विरोध केला होता.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरुर स्वागत करावे. मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार देण्यात आलेत. मतांचा कोटा 23 आमदारांचा आहे, त्यामुळं दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी दादांना एक एक मतांची गरज आहे…मलिक हे दादांच्याच राष्ट्रवादीचे मतदार असतील हे त्यांच्या बैठकीतल्या हजेरीवरुन क्लीअर झालं.
भाजपनं आपली भूमिका अजूनही तीच असल्याचं म्हटलं..पण शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची अडचण झाल्याचं दिसतंय..वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रताप सरनाईक म्हणालेत.
मलिकांनी स्वत:हून आपण शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत हे जाहीर केलेलं नाही. मात्र आपल्या कृतीतून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसोबतच असल्याचं दाखवून दिलंय. अर्थात फडणवीसांची प्रतिक्रिया त्यावर आलेली नाही.