Tv 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, आधी मुख्यमंत्री वनकुटे गावात पोहोचले, आता शेतकऱ्यांना मदतही पोहोचली

| Updated on: Apr 11, 2023 | 9:46 PM

वनकुटे गावामध्ये 9 एप्रिलला झालेल्या वादळ आणि पावसामुळे त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले होते. या घरांची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ग्रामस्थांना तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात घरे उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले. त्यांनतर शेतकऱ्यांना अवघ्या काही तासांत मदत पोहोचली.

Tv 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, आधी मुख्यमंत्री वनकुटे गावात पोहोचले, आता शेतकऱ्यांना मदतही पोहोचली
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हाहाकार उडाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये 9 एप्रिलला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वनकुटे गावात थेट घरांची पडझड झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा राहण्याचा प्रश्न उभा राहिला होता. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने सर्वात आधी बातमी प्रदर्शित केली. वनकुटे गावातील भीषण परिस्थितीची बातमी प्रदर्शित केल्यानंतर या घटनेची दखल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच काल नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी सटाणा तालुक्यात शेताच्या बांधावर दाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरवण्याचं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर लगेच सूत्र हलली आणि नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आला. शेतकऱ्यांना लवकरच आता मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यासठी युद्ध पातळीवर पंचनामे सुरु असल्याची माहिती मिळत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक जिल्ह्याच्या दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान ‘टीव्ही 9 मराठी’ने आज सकाळी अहमदनगरच्या वनकुटे गावात शेतकऱ्यांच्या घराची झालेल्या पडझडचं वृत्त प्रदर्शित केलं होतं. या वृत्ताची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली. एकनाथ शिंदे आज सकाळीच वनकुटे गावाच दाखल झाले. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वनकुटे गावात हिरामण बर्डे यांच्या घराची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे बर्डे यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालंय. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मदत पोहोचली

वनकुटे गावामध्ये 9 एप्रिलला झालेल्या वादळ आणि पावसामुळे त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले होते. या घरांची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ग्रामस्थांना तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात घरे उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले. त्यानुसार अवघ्या काही तासांत गावामध्ये पत्रे घेऊन ट्रक पोहोचले. तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या घरांचे काम सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण केला, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी खासदार सुजय विखे पाटील हे देखील तिथे आले होते. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घराबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतलाय की, शासकीय जमीन देऊन त्यांना घरकूल योजनेतून एक वर्षात घर बांधलं जाईल, असं सुजय विखे पाटील यांनी दिली.

“मी स्वत: सूचना दिलेल्या आहेत. विविध पातळीवर पंचनामा होतील. सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना एनडीआरएफचे नॉर्म डावलून दुप्पट देण्याचा निर्णय घेतलाय. आपण जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान दिली होती.